सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यात एटीएसची कारवाई, उच्चशिक्षित IT इंजिनिअरला अटक, बॉम्ब तयार करण्याची माहिती असणारं पुस्तक सापडलं
 जिल्हा

राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा राज्यातील २४ विद्यापीठांच्या कुलगुरुंशी संवाद

डिजिटल पुणे    29-10-2025 12:59:23

मुंबई : महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरुंशी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला.विद्यार्थ्यांना केवळ अक्षरज्ञान व पदवी देणे इतकेच कर्तव्य नसून विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना कौशल्य ज्ञान द्यावे, उद्यमशील बनवावे तसेच विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी त्यांना जबाबदार नागरिक घडवावे अशी सूचना राज्यपालांनी कुलगुरूंशी साधलेल्या पहिल्या संवादात केली. संवाद सत्राला राज्यातील सर्व २४ अकृषी विद्यापीठांचे कुलगुरु तसेच निवडक विभागांचे सचिव उपस्थित होते.विद्यापीठांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची पूर्ण प्रामाणिकपणे अंमलबजावणी करावी तसेच विद्यापीठांचे राष्ट्रीय गुणांकन सुधारावे अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली. महाराष्ट्र हे शैक्षणिक दृष्ट्या प्रगत राज्य आहे.  आज आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमुळे स्पर्धा वाढत असताना आपल्या विद्यापीठांचे गुणांकन घसरत आहे ही चिंतेची बाब आहे असे सांगून विद्यापीठांनी या संदर्भात पावले उचलावी असे राज्यपालांनी सांगितले.

विद्यापीठांनी दर तीन महिन्यांना केलेल्या कार्याचा अहवाल राजभवनाला पाठवावा अशी महत्वाची सूचना राज्यपाल देवव्रत यांनी यावेळी कुलगुरुंना केली. अहवालामध्ये विद्यापीठांनी आपल्या अडचणी – समस्या देखील मांडाव्या असे त्यांनी सांगितले.

युवक – विद्यार्थी खेळले नाही, मैदानावर गेले नाही व घाम गाळून आपल्या ऊर्जेचा सदुपयोग केला नाही तर त्या ऊर्जेचा ते निश्चितच दुरुपयोग करतील असे सांगून विद्यापीठ – महाविद्यालयांनी आपली क्रीडांगणे व इतर क्रीडा सुविधा सुस्थितीत ठेवाव्या, क्रीडा विभाग बळकट करावे तसेच किती विद्यार्थी खेळावयास जातात व  क्रीडा सुविधांचा उपयोग करतात या गोष्टींकडे लक्ष ठेवावे असे त्यांनी सांगितले. याबाबतचा कार्यअहवाल विद्यापीठांनी राजभवनाला पुढील तीन महिन्यात द्यावा अशी सूचना त्यांनी केली.

विद्यापीठांनी महिला व बालकल्याण विभागासोबत कार्य करावे व महिला सशक्तीकरणासाठी विद्यार्थिनींना कौशल्य शिक्षण द्यावे असे त्यांनी सांगितले. विद्यापीठांनी आपले प्रशासन सुधारले पाहिजे व ते अधिक स्वच्छ व पारदर्शक केले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

देशाला गतवैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर युवक हीच आपली संपदा आहे. आजचे विद्यार्थी साक्षेपी असून शिक्षक किती अद्ययावत आहेत, ते बोलतात कसे, चालतात कसे, वेळेवर येतात की नाही या सर्व गोष्टी पाहत असल्यामुळे शिक्षकांनी अद्ययावत तसेच वक्तशीर असले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

विद्यापीठ – महाविद्यालयांनी आपली वसतिगृहे, भोजन कक्ष, स्वच्छतागृहे नीटनेटकी आहेत की नाही हे तपासले पाहिजे. आपण हिमाचल प्रदेश येथे राज्यपाल असताना स्वतः विद्यापीठांच्या स्वच्छतागृहांची वाईट दशा पाहिली होती असे सांगून कुलगुरु – अधिकाऱ्यांनी वसतिगृहे – मेस नीट आहेत की नाही, हे पाहावे; अधूनमधून विद्यार्थ्यांसह तेथे भोजन करावे. सर्वच गोष्टी वॉर्डनच्या भरवशावर सोडू नये असे राज्यपालांनी सांगितले.

वसतिगृहे ही व्यसनाची केंद्रे होऊ नये याकडे सर्वांनीच लक्ष दिले पाहिजे व ही आपली प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. व्यसनाधीनता वाढत आहे. याकरिता विद्यापीठांनी विद्यार्थ्यांसाठी अधून मधून व्याख्याने – कार्यशाळा आयोजित करून त्यांना व्यसनांपासून दूर राहण्याचे प्रयत्न केले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

विद्यापीठांनी वृक्षारोपण, व्यसनमुक्ती या कार्यात आपल्या विद्यार्थ्यांना तसेच रासेयो व एनसीसीच्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले पाहिजे असे त्यांनी सांगितले.भारतीय ज्ञान प्रणाली लागू करून विद्यार्थ्यांना नैतिक शिक्षण देणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले.  विद्यापीठांनी शाळांना भेटी देऊन अधिकाधिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी करून घेतल्यास उच्च शिक्षणातील युवकांचे प्रमाण सध्याच्या २७ टक्क्यांहून वाढेल असे त्यांनी सांगितले.

पदवीनंतर युवक कोणत्या क्षेत्रात जातात याची माहिती विद्यापीठांनी ठेवावी तसेच माजी विद्यार्थ्यांना विद्यापीठाशी जोडून ठेवावे व त्यासाठी माजी विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करावे असे राज्यपालांनी सांगितले.आपण गुजरात येथील विद्यापीठात स्वतः हाती झाडणी घेऊन सात दिवस स्वच्छता केली आहे. राज्यातील विद्यापीठांमध्ये देखील आपण अशी भेट देऊ असे राज्यपालांनी यावेळी कुलगुरूंना सांगितले.

राज्यपालांनी केलेल्या सूचना

१. नवे शैक्षणिक धोरण पूर्ण प्रामाणिकपणे राबविण्याची सूचना

२. जबाबदार नागरिक घडवण्यात विद्यापीठांची भूमिका सर्वात महत्वाची

३. भारतीय ज्ञान प्रणाली लागू करावी

४. विद्यापीठांनी आपले गुणांकन सुधारावे

५. विद्यार्थ्यांना खेळण्यास प्रेरित करण्याची सूचना

६. विद्यार्थिनींना कौशल्य शिक्षण प्राधान्याने द्यावे

७. प्रशासन पारदर्शक व गतिमान करण्याची सूचना

८. वसतिगृह, मेस, स्वच्छतागृहे येथे अधूनमधून पाहणी करावी

९. विद्यापीठांनी स्कुल कनेक्ट कार्यक्रम नेटाने राबवावा

 


 Give Feedback



 जाहिराती