नवी दिल्ली : ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताचा अपमान केल्यास कठोर कारवाई करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘प्रिव्हेंशन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर ॲक्ट, 1971’ या कायद्यात सुधारणा करण्यास मंजुरी दिली असून, आता या कायद्यांत ‘वंदे मातरम्’चाही समावेश केला जाणार आहे.
या बदलानंतर राष्ट्रीय गीताचा अवमान, त्यावेळी अडथळा निर्माण करणे किंवा अनादर दाखवणे हा दंडनीय गुन्हा ठरेल. अशा प्रकारच्या कृत्यासाठी 3 वर्षांपर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद लागू होणार आहे. सध्या ही शिक्षा राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज आणि राज्यघटनेच्या अवमानासाठी लागू आहे.
दरम्यान, गृह मंत्रालयाने याआधीच ‘वंदे मातरम्’ संदर्भात काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. अधिकृत कार्यक्रमांमध्ये हे गीत पूर्ण सहा कडव्यांसह सादर करावे, असा सल्ला देण्यात आला होता. तसेच, राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत दोन्ही वाजवायचे असल्यास ‘वंदे मातरम्’ला प्राधान्य द्यावे, असेही नमूद करण्यात आले होते.
आतापर्यंत या सूचना केवळ सल्लागार स्वरूपाच्या होत्या; मात्र कायद्यातील सुधारणेमुळे त्यांना आता कायदेशीर बळ मिळणार आहे.‘वंदे मातरम्’ हे बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी 19व्या शतकात लिहिले असून ते त्यांच्या ‘आनंदमठ’ कादंबरीत प्रसिद्ध झाले. स्वातंत्र्यलढ्यात या गीताने महत्त्वाची प्रेरणा दिली होती.