मुंबई : मुघल बादशाह औरंगजेबच्या खुलताबाद येथील कबरीमुळे महाराष्ट्रात नवा वाद निर्माण झालाय… ज्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजाना हाल हाल करून मारलं त्याची कबर उखडून टाका अशी मागणी काही हिंदू संघटना आणि राजकीय नेत्यांनी केली आहे…. तर काहींनी औरंगजेबाची कबर म्हणजे मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक आहे असं म्हणत कबर उकरून न टाकण्याची भूमिका मांडली. या एकूण सर्व घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रथमच थेट भाष्य करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. औरंगजेबाची सध्याची सजवलेली कबर काढून टाका. तेथे फक्त कबर दिसली पाहिजे आणि त्या ठिकाणी एक मोठा बोर्ड लावा. आम्हा मराठ्यांना संपवायाला आलेला औरंगजेब येथे गाडला गेला असं राज ठाकरे म्हणाले.
काल शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडला, त्यावेळी आपल्या भाषणात राज ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर परखडपणे भाष्य केलं. औरंगजेबाचं राज्य कुठपासून कुठपर्यंत होतं? आफगाणिस्तानपासून दक्षिणेपर्यंत. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यावरून महाराष्ट्रात परत आले, राज्याभिषेक झाला आणि काही काळानंतर महाराजांचं निधन झालं. या दरम्यानच्या काळात औरंगजेबाचा एक मुलगा दक्षिणेत आला. त्या औरंगजेबाच्या मुलाला छत्रपती संभाजीराजे यांनी शह दिला. १६८१ ते १७०७ म्हणजे २७ वर्ष औरंगजेब महाराष्ट्रात लढत होता. छत्रपती संभाजीराजे यांच्याबरोबर औरंगजेब लढला. त्यांना क्रूर पद्धतीने मारलं. राजाराम महाराज, संताजी धनाजी, ताराराणी साहेब लढल्या. एका पुस्तकात एक फार चांगलं वाक्य आहे. मराठे सर्व लढाया हारत होते, पण औरंगजेब एकही लढाई जिंकू शकत नव्हता”, असं राज ठाकरे म्हणाले.
औरंगजेबाने तेव्हा परत जायला पाहिजे होतं. मात्र, एवढ्या मोठ्या बलाढ्य प्रदेशाचा राजा महाराष्ट्रात ठाण मांडून का बसला होता? कारण औरंगजेबाला शिवाजी नावाचा विचार मारायचा होता. पण ते काम त्याला जमलं नाही, त्याने सर्व प्रयत्न केले आणि शेवटी औरंगजेब याच महाराष्ट्रात मेला. जगाच्या इतिहासात औरंगजेब वाचला जातो. तेव्हा जगभरातील लोकांना कळतं की औरंगजेब काय करायला गेला होता आणि कसा मेला. तेव्हा जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतं. आज सर्व औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून वाद सुरु आहे. पण माझं एकच मत आहे, औरंगजेबाची सध्याची सजवलेली कबर काढून टाका. तेथे फक्त कबर दिसली पाहिजे आणि त्या ठिकाणी एक मोठा बोर्ड लावा. आम्हा मराठ्यांना संपवायाला आलेला औरंगजेब येथे गाडला गेला. हा आमचा इतिहास आहे”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं..