मुंबई : पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी जागतिक वसुंधरा दिन दिनांक २२ एप्रिल, २०२५ ते महाराष्ट्र दिन १ मे, २०२५ या कालावधीत पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने राज्यात ‘पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा’ (पर्यावरण बचाओ वसुंधरा सजाओ) हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे.‘पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा’ या उपक्रमांतर्गत मंत्री पंकजा मुंडे या स्वतः २२ एप्रिल रोजी मुंबईतील पवई तलाव येथे स्वच्छता मोहिमेत सहभागी होणार आहेत. या उपक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्रीमती मुंडे यांनी केले आहे.
नदी, नाले, तलाव स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे
श्रीमती मुंडे म्हणाल्या, 22 एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिवस आहे. या दिवशी आम्ही पर्यावरण वातावरणीय बदल विभागामार्फत एक अत्यंत चांगली संकल्पना राबवत आहोत. ती संकल्पना म्हणजे जागतिक वसुंधरा दिवसाच्या पासून म्हणजे, 22 एप्रिल ते 1 मे महाराष्ट्र दिनापर्यंत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. जसं आपण नवरात्र साजरा करतो, नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा करतो, आराधना करतो, तसंच वसुंधरेची आराधना करण्यासाठी हे नऊ दिवस विविध कार्यक्रम आपण सर्वांनी राबवावेत.
22 एप्रिल रोजी या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. मी स्वतः 22 एप्रिल रोजी पवई लेक मुंबई येथून स्वच्छतेची सुरुवात करणार आहे. दि. 22, 23 आणि 24 एप्रिल रोजी आपण सर्वांनी आपापल्या भागातील, आपल्या गावातील, आपल्या तालुक्यातील, आपल्या जिल्ह्यातील, आपल्या महानगरातील, नगरातील पाण्याचे विविध स्त्रोत साफ करायचे आहेत. नद्या, नाले, तलाव ह्यांची स्वच्छता करायची आहे. ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकापासून ते जिल्हा परिषद सीईओपर्यंत, तलाठ्यापासून ते जिल्हाधिकारीपर्यंत, ग्रामपंचायतच्या सरपंच, सदस्यापासून ते जिल्हा परिषद अध्यक्षापर्यंत आणि आमदार, खासदार, पालकमंत्री या सर्वांनी यामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन श्रीमती मुंडे यांनी केले आहे.
याबरोबर शासकीय यंत्रणासमवेत वेगवेगळ्या संघटना, स्वयंसेवी संस्था यांनी देखील यामध्ये सहभाग घ्यावा. नदी – नाले, सरोवर स्वच्छ करणाऱ्या लोकप्रतिनिधीचे अधिकाऱ्याचे आणि सामाजिक संस्थेचे मूल्यमापन करून त्यांचा सुद्धा जिल्हा पातळीवर पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहणानंतर सन्मान होईल आणि राज्यभरातून अशा अत्यंत चांगल्या काम केलेल्या लोकांचा राज्यपातळीवरही सन्मान होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
रीड्यूस, री-यूज आणि रिसायकल या त्रिसूत्रीचा प्रयोग करणाऱ्यांचा होणार सत्कार
दि. 25, 26 आणि 27 एप्रिल या तीन दिवसांमध्ये विविध संघटना, शासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी या सर्वांनी मिळून रीड्यूस, री युज आणि रिसायकल या तत्त्वाप्रमाणे म्हणजे, आपण कुठल्याही चुकीच्या गोष्टींचा वापर कमी करणे म्हणजे रीड्यूस करणे, त्याचबरोबर कोणत्याही चांगल्या गोष्टी ज्या आपण परत परत वापरू शकतो त्यांचा रीयूज करणे आणि कुठल्याही गोष्टी जसे पाणी रिसायकल करतो आणि ते वापरतो त्यामुळे आपण वसुंधरेचा म्हणजे पृथ्वीचा फार मोठा फायदा त्याच्यामधून होतो आणि पर्यायी आपल्याला त्याचा फायदा होत असतो. त्यामुळे या त्रिसूत्री चा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
श्रीमती मुंडे म्हणाल्या की, रीड्यूस, री यूज आणि रिसायकल या तत्त्वावर कोणी जर अत्यंत चांगले प्रयोग केले असतील, तर या प्रयोगांचा सन्मान एक मे रोजी महाराष्ट्रदिनी ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते त्या त्या जिल्ह्यामध्ये होईल. तसेच हे प्रयोग राज्य पातळीवर मागवून यांच्यामधले उपयुक्त प्रयोगाचे कौतुक करून त्यांचा सन्मान करण्यात येईल. तसेच अशा प्रयोगाचा उपयोग विविध योजनामध्ये करण्याचा विचार आहे, असेही त्यांनी सांगितले.
घोषवाक्य स्पर्धा घेऊन विजेत्यांना गौरविणार
दि . 28, 29 व 30 एप्रिल या तीन दिवसांमध्ये पर्यावरण बचाव वसुंधरा सजाव या अभियानाच्या माध्यमातून घोषवाक्य (स्लोगन) स्पर्धा घेण्यात येणार आहेत. त्यातील उत्कृष्ट घोषवाक्य तयार करणाऱ्यांचा सन्मान हा महाराष्ट्र दिनानिमित्त करण्यात येईल. तसेच या घोषवाक्याचा समावेश महाराष्ट्र दिनाच्या संचलनात देखील करण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यामधून तीन असे घोषवाक्य घेऊन राज्यस्तरावर तीन उत्कृष्ट घोषवाक्य निवडण्यात येतील. याचा वापर महाराष्ट्राच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या जाहिरातींमध्ये केला जाईल. उत्कृष्ट तीन घोषवाक्य करणाऱ्यांचा राज्यस्तरावर सन्मान करण्यात येईल.
22 एप्रिल ते 1 मे या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. हे उपक्रम यशस्वी होण्यासाठी लोकप्रतिनिधी तसेच सामान्य नागरिक यांचा सहभाग आवश्यक आहे. त्यामुळे या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीमती मुंडे यांनी केले आहे.