नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान सीमावर्ती तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडून विविध अफवा आणि खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. सोशल मीडियावर काही पोस्ट्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्या आहेत, ज्यामध्ये भारताचे फायटर जेट क्रॅश झाले, भारतीय महिला पायलट पाकिस्तानच्या ताब्यात आहे, तसेच भारताचा एस-400 डिफेन्स सिस्टम पाकिस्तानने उद्ध्वस्त केला असल्याचे दावे करण्यात आले. पीआयबीने हे वृत्त फेक असल्याचं सिद्ध केलं आहे. भारतीय महिला हवाई दलाच्या पायलट स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंग यांना पकडल्याचा दावा पाकिस्तानी समर्थक सोशल मीडिया हँडलवरून करण्यात आला होता. मात्र कोणत्याही भारतीय महिला हवाई दलाच्या पायलटला किंवा कोणत्याही सैनिकाला पकडण्यात आलेले नाही, असं पीआयबीने म्हटलं आहे.
पहिला दावा
पहिला दावा होता की, पाकिस्तानने भारताच्या एस-400 एअर डिफेन्स सिस्टिमवर हल्ला केला आणि ती प्रणाली नष्ट केली. सोशल मीडियावर या संदर्भात अनेक पोस्ट्स व्हायरल झाल्या. परंतु पीआयबीने स्पष्ट केले की, हा दावा पूर्णपणे खोटा असून एस-400 सिस्टिम सुरक्षित आहे. कोणत्याही प्रकारचा हल्ला झाला नाही आणि यासंदर्भात कोणताही पुरावा उपलब्ध नाही.
दुसरा दावा
दुसरा दावा होता की, भारतीय वायुसेनेचे काही फायटर जेट्स नुकतेच क्रॅश झाले आहेत. या अफवेमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले. परंतु पीआयबीने यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, अशा कोणत्याही दुर्घटनेची नोंद नाही आणि ही माहिती तथ्यहीन आहे.
तिसरा दावा – शिवांगी सिंह सुरक्षित
तिसरा आणि सर्वाधिक संवेदनशील दावा असा करण्यात आला की, भारतीय महिला फायटर पायलट शिवांगी सिंह पाकिस्तानकडून पकडण्यात आल्या आहेत. हा दावा विशेषतः पाकिस्तानसमर्थक सोशल मीडिया खात्यांवरून पसरवण्यात आला होता. मात्र पीआयबीने या दाव्याचे खंडन करत स्पष्ट केले की, स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंह पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि त्यांच्याबाबत कोणतीही अनिष्ट घटना घडलेली नाही.
या तिन्ही दाव्यांवरून स्पष्ट होते की, पाकिस्तान आता फक्त सैनिकी पातळीवर नव्हे, तर माहितीच्या माध्यमातून देखील भारताविरोधात मानसिक युद्ध छेडण्याचा प्रयत्न करत आहे. खोट्या बातम्यांच्या आधारे जनमत गोंधळवण्याचा हा प्रयत्न भारतीय यंत्रणांनी वेळेत हाणून पाडला आहे. पीआयबी च्या या स्पष्टीकरणामुळे देशातील नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या बातम्यांकडे योग्य तथ्य तपासणीशिवाय विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.