सर्वव्यापी जाणीव अर्थात विश्वमन (भाग १)
म्हणाल तेथे कैची जाणीव | तरी ऐका याचा अभिप्राव | पिंडी माहाकारण देही सर्व | साक्षिणी अवस्था ||९/६/४||
आकाशाला आकार नाही तसा ब्रह्माला आकार नाही. जशी निराकार, निर्विकार आकाशात वायूची लहर येते तसे निर्विकार ब्रह्मात मूळमाया उत्पन्न झाली. मूळमायेत तीन गुण, पंचमहाभूते बीजरुपात असतात. सातव्या दशकात हा विषय प्रथम सांगितला गेला. आठव्या ज्ञानदशकात हा विषय अधिक स्पष्ट केला गेला. तीन गुणांपैकी जाणीव तो सत्त्वगुण होय, हा ज्ञानमय असतो. थोडी जाणीव, थोडी नेणीव, ज्ञान-अज्ञान असे मिश्रण ज्यात आहे तो रजोगुण असतो तर नेणीव, अज्ञान हा तमोगुण आहे.
आता मूळमायेतील ही जाणीव कुठून आली ते बघू. पिंडाचे चार देह असतात. त्यात महाकारण हा चौथा आहे. सर्वसाक्षिणी तुर्या अवस्था हे त्या देहाचे लक्षण आहे. ब्रह्मांडाचे देखील चार देह आहेत त्यापैकी मूळप्रकृती हा महाकारण देह आहे. जो ज्ञानमय आहे. ते शुद्ध जाणिवेचे स्थान आहे. जाणीव तेथे ज्ञान असतेच. किंवा ज्ञान आहे म्हणजे जाणीव असतेच.
त्रिगुण मूळमायेत साम्य स्थितीत असतात. गुणमाया प्रकट होताच हे तीन गुण विषम होतात आणि व्यक्त दशेला येतात. म्हणून ही गुणक्षोभिणी माया त्रिगुणांना व्यक्त दशेला आणणारी संधी आहे हे चतुर लोकांनी ओळखावे. जसे धान्याचे कणीस आधी बंद असते. ते पिकले की ते उकलुन आतले धान्य मोकळे होते. तसे मूळमाया त्रिगुणांना पोटात घेऊन असते पुढे गुणमाया प्रगट होऊन ते गुण बाहेर व्यक्त दशेला येतात. मूळमाया वायुस्वरूप म्हणजे शक्तीस्वरूप असते. थोड्या गुणांचा विकार आढळला की ती गुणक्षोभिणी होते. आणि त्रिगुणांच्या मिश्रणाने विश्व आकाराला येते. यात प्रथम साडेतीन मात्रांचा ओंकार प्रगट झाला. याला हिरण्यगर्भ किंवा शब्दब्रह्म असे म्हणतात. हेच देवाचे एक तत्व नाम आहे.
शब्द आकाशाचा गुण आहे हेच याचे सार आहे. वेदशास्त्र शब्दांनीच आकाराला आले. पाच भुते आणि तीन गुण मिळून अष्टधा प्रकृती असते. ही मूळमायेचाच विकार आहे. मूळमायेत मी ब्रह्म आहे हे ज्ञान किंवा जाणीव असते आणि मी दृश्य आहे ही अज्ञानरूप नेणीव हिच्या मागोमाग येते. जर ही मूळमाया नसती तर परब्रह्माला स्वत:ची ज्ञानरूप जाणीव झालीच नसती. पण ही जाणीव झाली की मागून नेणीव आपोआप येते. म्हणून जाणीव-नेणीव, ज्ञान-अज्ञान यांना मूळमायेशिवाय स्थान नाही. मूळमाया वायुरूप आहे, म्हणजे तिथे हालचाल आहे म्हणजे ती जाणीवरूप आहे. म्हणूनच परब्रह्माला या मूळमायेमुळे मी ब्रह्म आहे अशी स्वत:ची ज्ञानरूप जाणीव आहे. ही जाणीव शक्तिमय, ज्ञानमय असते.
हालचाल करणे हे शक्तिचे लक्षण आहे म्हणून तिथून गुणमाया प्रकट झाली. त्या गुणमायेतून तीन गुणांच्या आधाराने दृश्य विश्व आकाराला आले.
कथाव्यास/प्रवचनकार/लेखक : श्री. दामोदर रामदासी पुणे. (रामदासी मठ परंपरा, नवगणराजुरी, जिल्हा बीड)