पुणे : पुण्यातील रेल्वे स्टेशन बाहेर झालेल्या वाहनांच्या गर्दीमुळे निर्माण झालेल्या समस्येवर भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी प्रकाशझोत टाकला आहे. रेल्वेने प्रवास करताना त्यांना हा अनुभव आला आहे. याबाबत त्यांनी पुण्याचे मंडल रेल प्रबंधक, ( डी आर एम ) राजेश वर्मा आणि पोलीस आयुक्त, अमितेश कुमार यांचेशी लेखी पत्रव्यवहार करून याप्रश्नी लक्ष देऊन प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे. त्यांनी दिलेल्या पत्रात मंगळवार 6 मे नागपूर येथून प्रवास करून सकाळी 10 वाजता पुण्यात रेल्वे स्थानकात आल्यावर आलेले अनुभव आपल्या निदर्शनास आणू इच्छितो.
1) रेल्वे स्थानकाच्या आवारात ( प्लॅटफॉर्म व पोर्च सह ) प्रचंड गर्दी होती व या ठिकाणी नागरिकांना सुरक्षित वाटावे असे परिस्थिती नव्हती. चेंगराचेंगरी सदृश परिस्थिती दिसून आली.
2) आवारात प्रचंड वाहतूक कोंडी होती व सर्वत्र रिक्षा व टॅक्सी वाल्यांचे राज्य दिसून आले. पिक अप व ड्रॉप साठी आलेली वाहने ह्या कोंडीत अडकून पडली होती.
3) प्लॅटफॉर्म वर प्रवेश करताना व बाहेर येताना दोन छोटे दरवाजे उघडलेले होते व मुख्य दरवाजा बंद होता त्यामुळे आत येणारे व बाहेर जाणाऱ्यांची गर्दी व धक्काबुक्की सुरु होती.तसेच आत जाताना स्कॅनर वर बॅग तपासणी देखील केली जात नव्हती. येथील मुख्य दरवाजा बंद करून साईड च्या दोन छोट्या दरवाज्यातून नागरिकांना ये जां करण्यास सांगण्याचा हेतू समजला नाही.
तरी ह्या निवेदनाद्वारे आपणास अशी मागणी करतो की ह्या परिस्थितीत त्वरित सुधारणा व्हावी व प्रवाश्यांना दिलासा मिळावा !!
( आज देखील माहिती घेतली असता अशीच परिस्थिती असल्याचे नागरिकांनी सांगितले ) असेही त्यांनी म्हटले आहे.