सर्वव्यापी जाणीव अर्थात विश्वमन (भाग २)
येकापासून येक झाले | हे येक उगेचि दिसोन आले | स्वरूप मुळीच भासले | त्रिगुणभूतांचे ||९/६/१४||
मागील लेखात आपण विश्व आकाराला कसे आले हे बघितले. हे एकातून एक झाले असे दिसले. तीन गुण आणि पंचमहाभूते हे मूळमायेत बीजरूपाने मिसळलेली होतीच. आपल्या बुद्धीला स्थळकाळाची भाषा समजते, स्थूल घटनांचा मागोवा घेताना हे आधी, हे नंतर, हे कार्य, हे कारण असा विचार आपण करतो. पण सूक्ष्म, अतींद्रिय घटनांबाबत मात्र हे आधी नी हे नंतर हे ठरवणे अशक्य होऊन बसते. कारण त्या सूक्ष्मात अजून काल निर्माण झालेला नसतो. त्यामुळे मूळमाया आणि गुणमाया याचा कालक्रम ठरवणे योग्य नाही. ते तर्काने ठरवावे लागते. आधी मूळमायेतील एकरूप असलेले तीन गुण, पंचभुते नंतर गुणमायेमुळे एकातून अनेकपणा होऊन त्रिगुण व पंचभूते वेगळेपणाने अनुभवला येऊ लागली.
येथे अनेकपणाचा क्रम सांगताना एकातून दुसरे झाले हे म्हणता येते. आतापर्यंत वायूत असलेले मिश्रण सांगितले. या वायुतून तेज निघाले. या अग्नीत वायूप्रमाणेच मिश्रण असते. अग्नीपासून पाणी झाले. त्यातही मिश्रण असते. त्या पाण्यापासून पृथ्वी झाली. तिच्यातही मिश्रण आहेच. आता शंका अशी येते की पाचभुते तर दिसायला निर्जीव दिसतात त्यांच्यात जाणीव आढळत नाही. तर याचे उत्तर असे की हेतूपूर्वक होणारी हालचाल म्हणजे जाणीव होय. वायूचे हे लक्षण आहे. या वायूत सर्व गुण असतात. हे आता बघितलेच. जाणीव (कॉन्शीयसनेस) जिवंतपणाचे लक्षण आहे. आणि हेतुपूर्वक हालचाल जाणिवेचे लक्षण आहे. म्हणून जाणीव आणि नेणीव यांच्या मिश्रणाने पाचभूतांचा सगळा खेळ चालला आहे.
जाणीव या पाचभूतांना व्यापून असते. कोठे ती प्रकट दिसते तर कोठे अप्रकट असते. पाचभुते जरी आकाराला येऊन वेगळी दिसू लागली तरी ती एकमेकात मिसळलेली असतात. एक स्थूल तर एक सूक्ष्म असे त्यांचे रूप असते. वायू शांत असताना तो आहे असे वाटत नाही. तसे जाणीव गुप्त असल्यावर ती दिसत नाही तरी ती भुतांच्या अंतरी सूक्ष्मरूपाने असते. जसे लाकडात अग्नी असतो पण दिसत नाही. तसे जाणिवेचे आहे. विश्व निर्मिती कथा – १) परब्रह्मापासून मूळमाया झाली २) मूळमायेपासून गुणमाया झाली ३) गुणमायेपासून तीन गुण झाले. ४) या गुणांपासून पाच भूते निर्माण झाली. हे त्रिगुण व पंचभूते मिळून गुणमाया असते. ५) ही भूते वेगवेगळी होऊन दृश्य रुपाला आली. आकाश गुणापासून झाले हे कधीच घडत नाही.
शब्दाला अधिष्ठान हवे म्हणून आकाश कल्पिले आहे. बुद्धिमान नसलेल्या व्यक्तीला हे सर्व दृष्टांत देऊन शिकविले तरी समजत नाही. कारण हा सर्व अतींद्रिय विषय आहे. कल्पना सूक्ष्म आहेत. केवळ अंदाज यावा म्हणून दृष्टांत सांगावे लागतात. त्याचा अर्थ लावताना दृश्याचा अर्थ करण्याची रीत वापरू नये. केवळ संकेताने अर्थ ध्यानात घ्यावा. तर असो या पाच भूताहून श्रेष्ठ कोण आहे ? असा प्रश्न पडला तर मूळमायाच या भूतांनी भरलेली आहे. तिच्या पलीकडे निर्गुण ब्रह्म आहे. ही पाचभूते दृष्टीला जड भासतात तरी सूक्ष्म दृष्टीला ती जाणीवेची, शक्तिची रूपे आहेत, सगळीकडे शक्तीचा संचार आहे याचा अनुभव येतो.
श्रीराम कथाव्यास / प्रवचनकार / लेखक : श्री. दामोदर रामदासी पुणे. (रामदासी मठ परंपरा, नवगणराजुरी, जिल्हा बीड