सर्वव्यापी जाणीव अर्थात विश्वमन (भाग ३)
पिंडी व्यापक म्हणोन जीव | ब्रह्मांडी व्यापक म्हणोन शिव | तैसाच हाहि अभिप्राव | आकाशाचा ||९/६/३५||
जाणीव जेव्हा पिंडाला व्यापते तेव्हा त्यास जीव म्हणतात. जाणीव जेव्हा ब्रह्मांड व्यापून राहते तेव्हा तिला शिव म्हणतात. आकाशाबाबतही असाच विचार करायला हवा. पिंड वा ब्रह्मांड दोन्ही दृश्याची अमर्यादित शुद्ध जाणीव म्हणजे परमात्मस्वरूप होय. तसे दृश्य वस्तूला व्यापणारे आकाश आहे. ही दोन्ही सोडून उरणारे तत्त्व परमात्मा आहे. आकाश दृश्याच्या तडाख्यात सापडले. ते वेगळेपणाने अनुभवास येते. म्हणून ते पंचभूतात्मक आहे. आकाश अवकाशरूप आहे, शून्य आहे. साक्षित्वाने ते अनुभवास येते. पण परब्रह्म शून्य नसल्याने त्याचे असणे कधी लोपत नाही. दृश्यपणाची कोणतीही उपाधी नसणारे जे आकाश तेच परब्रह्म आहे.
प्रकृती विस्तारत असताना एकातून एक उत्पन्न होत जाते. ती विकारवंत असल्याने तिच्यातून अनंत दृश्य निर्माण होत जाते. ही विविधता आश्चर्यकारक आहे. जसे काळे-पांढरे रंग मिसळल्याने पारवा रंग तयार होतो आणि काळे-पिवळे रंग एकत्र आले की हिरवा रंग तयार होतो. रंगांचे असे मिश्रण केल्याने मूळ रंग बदलतात व नवीन रंग तयार होतात तसे दृश्य मुळात विकारवंत असल्याने त्यात बदल होत जातात आणि नवीन नवीन दृश्य वस्तू बनत जातात. जसे पाणी एकच असते पण त्यात तरंग उमटतात. ते इतके वेगात उमटतात की त्यांना मोजणे शक्य होत नाही. पाणी हे एक भूत आहे त्याचे इतके बदल दिसतात. मग बाकी भूते मिळून किती पसारा आहे याची कल्पना करवत नाही. चौऱ्याशी लक्ष योनी हा त्याचाच एक भाग आहे. असंख्य प्राण्यांच्या देहाचे मूळ पाणी हेच आहे. माणसापासून किडामुंगी, श्वापदे त्या पाण्यापासूनच उत्पन्न झालेली आहेत.
रक्त आणि वीर्य हे पाणीच आहे. त्यातूनच तर शरीर तयार झाले. नखे, दात, हाडे पाण्यापासून उत्पन्न झाले आहेत. झाडांच्या मुळांना बारीक तंतुमय शाखा असतात, त्यातून जमिनीतले पाणी शोषले जाते व झाडात पसरते. त्या पाण्यापासून झाडाचा विस्तार होतो. आंब्याला मोहोर, झाडाला फळे, फुले पाण्यामुळे येतात. आंब्याच्या झाडाचे खोड, शाखा फोडून बघितले तर आंबे सापडत नाहीत. ओल्या साली सापडतील. मुळापासून शेंड्यापर्यंत फळ सापडत नाही. पाणी पोहोचल्यावर फळे-फुले येतात यावरून फळ हे जळरूप असते हे विवेकपूर्वक ठरवावे. एकातून दुसरे कसे निर्माण होते याचे हे उत्तम उदाहरण आहे. पंचमहाभूतात असे एकातून दुसरे नवीन बदल होत सगळे निर्माण होते. असंख्य पदार्थ, त्यांची बदलत जाणारी रूपे यांचा अभ्यास अर्थातच आधुनिक विज्ञान करत असते. पण सामान्य लोकांच्या दृष्टीने सृष्टीतील हे बदल व एकातून दुसरे असे अनंत पदार्थ निर्माण होत राहणे हे सगळे विलक्षण आहे. या गुणमय मायेचे निरसन विवेकाने सावकाश करावे आणि परमात्म स्वरूपाशी अनन्य होऊन जावे. त्याच्या भक्तीत रमावे.
श्रीराम कथाव्यास / प्रवचनकार / लेखक : श्री. दामोदर रामदासी पुणे. (रामदासी मठ परंपरा, नवगणराजुरी, जिल्हा बीड)