मुंबई : राज्यात वीज पडून होणारे मृत्यू टाळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत आहे. सध्या ४० किलोमीटर परिघात वीज पडण्याची पूर्वसूचना ‘दामिनी’ व ‘सचेत’ ॲपद्वारे दिले जात आहे. कमी परिघात वीज पडण्याची पूर्वसूचना देणारे नवीन ॲप विकसित करण्यात येईल, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाच्यावेळी दिली.या संदर्भात सदस्य समीर कुणावर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य भास्कर जाधव, संतोष दानवे आणि विजय वडेट्टीवार यांनी सहभाग घेतला.
मंत्री महाजन म्हणाले, राज्यात पावसाळी वातावरणात वीज पडून होणाऱ्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना याचा सर्वाधिक धोका होत आहे. मुसळधार पावसाबरोबरच वीज कोसळणे आणि वादळी परिस्थिती उद्भवते, यावेळी शेतीकाम करत असताना अनेक वेळा शेतकरी वीज पडण्याच्या दुर्घटनांत बळी पडतात.
वीज पडण्याची पूर्वसूचना अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहचून जीवित हानी टाळता यावी, यासाठी भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थेने (IITM) विकसित केलेली ‘दामिनी’ आणि ‘सचेत’ ही दोन ॲप्स नागरिकांना वीज पडण्याआधीच ४० किलोमीटर परिघात सावध करणाऱ्या सूचना देतात. शासनाच्या विविध विभागांतर्फे या ॲप्सचा प्रचार व प्रसार सातत्याने केला जात असल्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री महाजन यांनी सांगितले.राज्यात सन २०२२ मध्ये राज्यात वीज पडून २३६ व्यक्तींचा, तर २०२३ मध्ये १८१ व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याची माहिती मंत्री महाजन यांनी यावेळी दिली.
वीज पडून होणाऱ्या मृत्यूंच्या प्रकरणांत आपत्ती मदतीच्या निकषांनुसार शासनाकडून आर्थिक सहाय्यही दिले जाते. २०१७ नंतर वीज पडून मृत्यू झाल्यास कुटुंबियांना ४ लाखांची मदत, गंभीर जखमी व्यक्तीस २.५ लाखांची मदत, तर जनावरांच्या नुकसानीसाठी गाय/म्हैस/बैल यांना ३७ हजार ५००, मेंढी-शेळीसाठी ४०००, आणि कोंबडीसाठी १०० रुपये अशी भरपाई शासनाकडून दिली जात आहे. ही मदत वाढविण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले.
चंद्रपूर शहरातील नाल्यावर उर्वरित पूर संरक्षण भिंतीचे काम पूर्ण करणार – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड
चंद्रपूर शहरातील आकाशवाणी मार्गावरील नाल्यावर पूर संरक्षक भिंतीचे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून काम करण्यात आले आहे. या नाल्यावरील उर्वरित पूर संरक्षण भिंतीचे प्रस्ताव सादर करून या भिंतीचे कामही पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.चंद्रपूर शहरातील नालावरील संरक्षक भिंती बाबत सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
प्रश्नाच्या उत्तरात अधिक माहिती देताना मंत्री श्री. राठोड म्हणाले, नाल्याची नैसर्गिक रुंदी आणि प्रवाह कायम ठेवण्याबाबत तपासून घेऊनच नाल्यावरील उर्वरित संरक्षण भिंतीचे काम करण्यात येईल. याबाबत चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीही करण्यात येईल. नाला संपूर्ण चंद्रपूर शहरातून जात असल्याने संपूर्ण नाल्याचा नैसर्गिक प्रवाह लक्षात घेऊनच जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
नाल्यावरील संरक्षक भिंतीला जिल्हा नियोजन निधीतून ५ जुलै २०२३ रोजी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली. नाल्यावरील १२७ मीटर लांबीच्या संरक्षक भिंतीचे काम १५ डिसेंबर २०२४ पूर्ण करण्यात आले, अशी माहितीही मंत्री श्री. राठोड यांनी दिली. या प्रश्नाच्या चर्चेमध्ये सदस्य विजय वडेट्टीवार, किशोर जोरगेवार यांनीही सहभाग घेतला.