पुणे : गुजरातमधील अहमदाबाद येथे मागील महिन्यात विमानाचा मोठा अपघात झाला होता. उड्डाण घेताच विमान कोसळले होते. या दुर्घटनेत विमानातील एक प्रवासी वगळता सर्वजण मृत्यूमुखी पडले होते. आता या अपघाताबाबत विमान दुर्घटना तपास संस्थेने प्रारंभिक अहवाल सादर केला आहे. या अहवालात धक्कादायक माहिती नमूद करण्यात आली आहे. पायलट्सचं संभाषण समोर आलं आहे. त्यावर आता केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
काय म्हणाले केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ?
मोहोळ म्हणाले की, या अपघातामध्ये एआयबीने दिलेला हा प्राथमिक अहवाल आहे. हा अंतिम अहवाल नाही. पण जे काही पायलट्सचं संभाषण समोर आलं आहे. पण एआयबीने सांगितलं आहे. हा संवाद म्हणजे अंतिम निष्कर्ष नाही. तसेच ही एक स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे त्यामध्ये कुणीही हस्तक्षेप करू शकत नाही. मंत्रालय देखील त्यात हस्तक्षेप करत नाही.
ही चौकशी निपक्षपणे सुरू आहे. तसेच अशा चर्चा आहेत की, ही चौकशी करण्यासाठी या विमानाचा ब्लॅक बॉक्स हा परदेशात जाणार आहे. पण असं नाही. आता भारत आत्मनिर्भर आहे. त्यामुळे यापूर्वी असे अपघात झाले तर ब्लॅक बॅाक्स परदेशात पाठवावा लागायचा. आता आपणच वेगाने हे पुर्ण तपासू शकतो. तसेच पायलटच्या संभाषणाच्या आधारे काही निष्कर्ष काढता येणार नाही. कारण ते अत्यंत तोकडे संभाषण आहे. पुढची तपासणी आवश्यक आहे. त्या अहवालाची आपण वाट पहावी.
पायलटमधील संवादातून मोठा खुलासा?
या रिपोर्टमध्ये विमानाच्या पायलटमध्ये नेमका काय संवाद झाला याचाही खुलासा करण्यात आला आहे. पायलट सुमित सभरवाल आणि को-पायलट कुंदर यांच्यातील संवाद या रिपोर्टमध्ये आहे. इंजिन का बंद झालं हाच सर्वात मोठा प्रश्न होता याचं उत्तर कॉकपिट रेकॉर्डिंगमधून मिळालं आहे.
पहिला पायलट दुसऱ्या पायलटला म्हणाला, ‘तू स्विच का बंद केलंस?’ त्यावर दुसरा पायलट उत्तरला ‘मी नाही बंद केलं.’ असा संवाद यात आहे. याचा अर्थ असा निघतो या दुर्घटनेत दोन्ही वैमानिकांनी जाणूनबुजून विमानाचे इंजिन बंद केले नाही. तांत्रिक कारणामुळे असे घडू शकतो असा सूर या अहवालात दिसून येत आहे. तरीदेखील मानवी त्रुटींची शक्यता देखील नाकारता येत नाही. विमान अपघाताची सविस्तर चौकशी अजून सुरू आहे. दोन्ही इंजिन आपोआप कसे बंद झाले, नेमकं काय घडलं होतं याची माहिती घेण्याचं काम सुरू आहे.