पुणे : स्थानिक देशी वनस्पतींच्या संवर्धनासाठी गेली १७ वर्षे कार्यरत असलेल्या ‘जीविधा’ या संस्थेच्या वतीने यंदाही हिरवाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.३० जुलै ते दि .१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत तीन दिवस दररोज सायंकाळी साडेसहा ते ८ या वेळेत इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र, राजेंद्रनगर, पुणे येथे हा महोत्सव होणार आहे.हिरवाई महोत्सवामागचा उद्देश नागरिकांना स्थानिक देशी वनस्पतींबाबत जागरूक करणे आणि त्यांच्या लागवडीत जनसहभाग वाढवणे,हा आहे. यंदाच्या महोत्सवाची संकल्पना 'परस्पर संवाद' अशी असून त्यामध्ये वनस्पती आणि प्राणी जगत यांच्यातील परस्परसंबंधांविषयी सखोल माहिती देणाऱ्या व्याख्यानांचा समावेश आहे.
बुधवार, दि.३० जुलै रोजी ‘वनस्पती आणि कीटक यातील संबंध’ या विषयावर पर्यावरण अभ्यासक ईशान पहाडे यांचे व्याख्यान होणार आहे. गुरुवार, दि.३१ जुलै रोजी डॉ. अंकुर पटवर्धन हे ‘वनस्पती आणि पक्षी-सस्तनप्राणी यांच्यातील संबंध’ याविषयी माहिती देतील. शुक्रवार, दि.१ ऑगस्ट रोजी आयसर संस्थेतील संशोधक डाॅ.सागर पंडित यांच्याशी 'वनस्पतींचा रासायनिक संवाद' या विषयावर प्रसिद्ध वनस्पतीतज्ज्ञ डॉ.महेश शिंदीकर चर्चा करणार आहेत.
वनस्पती स्वतःच्या अन्ननिर्मितीसाठी, घरट्यासाठी वा संरक्षणासाठी प्राण्यांवर अवलंबून असतात. दुसरीकडे, प्राणीही अन्नसाखळीचा भाग म्हणून वनस्पतींच्यावर अवलंबून असतात. बीजप्रसार, परागीभवन आणि प्रजोत्पत्ती यासाठी कीटक, पक्षी, सस्तन प्राणी यांची भूमिका महत्त्वाची असते. हाच जैव सहजीवनाचा विषय या महोत्सवाच्या माध्यमातून उलगडण्यात येणार आहे.कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असून पर्यावरणप्रेमींनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन राजीव पंडित,वृंदा पंडित यांनी केले आहे.