पुणे – शहरात भीक मागण्यासाठी दोन वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तुळजापूर येथील पाच जणांच्या टोळीने ही चिमुरडी अपहरण करून तिचा वापर भिकेच्या व्यवसायात करण्याचा कट रचल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
भीक मागण्यासाठी दोनवर्षीय चिमुकलीचे अपहरण केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना दोन ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. सुनील सीताराम भोसले (वय ५१, रा. मोतीझारा), शंकर उजन्या पवार (वय ५०), गणेश बाबू पवार (वय ३५), शालूबाई प्रकाश काळे (वय ४५, तिघेही रा. डिकमाळ, ता. तुळजापूर, जि. धाराशीव) आणि मंगल हरफुल काळे (वय १९, रा. खडकी रेल्वे लाईन झोपडपट्टी, पुणे) अशी त्यांची नावे आहेत. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली.
फिर्यादी धनसिंग हनुमंत काळे (वय २५) हे आपल्या कुटुंबासह कात्रजमधील वंडर सिटी परिसरातील झोपडी वजा घरात वास्तव्यास आहेत. त्यांना चार अपत्य असून त्यातील दोन वर्षाच्या जुळ्या मुली आहेत. घटना २५ जुलै रोजी रात्रीची आहे. रात्रीच्या सुमारास संपूर्ण कुटुंब झोपेत असताना, चिमुरडीला झोपाळ्यातून उचलून नेण्यात आले. मध्यरात्री जाग आल्यावर ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
ही घटना 25 जुलै व 26 जुलै च्या मध्यरात्री घडली आहे. कात्रज येथे असणाऱ्या वंडर सिटी झोपडपट्टी परिसरातून या मुलीला पळवण्यात आलं होतं याबाबत धनसिंग काळे यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती. या मुलीच्या आईने तिला झोळीत झोपवले होते. झोपलेले असताना त्यांची दुसरी मुलगी रडल्याने त्यांना जाग आली यावेळी झोळीत पाहिल्यावर त्यामध्ये त्यांना त्यांची मुलगी दिसून आली नाही. मुलगी दिसली नाही त्यामुळे त्यांनी लगेचच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
यानंतर जवळपास 140 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे तपासून पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला. त्यानुसार भारती विद्यापीठ आणि गुन्हे शाखेच्या पथकाने धाराशिव पोलिसांच्या मदतीने या सर्व आरोपींना ताब्यात घेतले आणि या दोन वर्षांच्या मुलीला सुद्धा तिच्या पालकांकडे सोपवण्यात आले आहे.
तुळजापूर येथील आरोपी हे पूर्वीही अशा गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. त्यांनी शहरांमध्ये फिरून बालकांचे अपहरण करून त्यांना भीक मागण्यासाठी भाग पाडल्याचे उघड झाले आहे.या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून या टोळीच्या इतर साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.