छत्रपती संभाजीनगर - शासकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांनी आपल्या विभागामार्फत पारदर्शकतेने व सौजन्यशील सेवा लोकांना द्यावी. अशी सेवा मिळणे हा लोकांचा अधिकार असून त्या उद्देशानेच महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ हा कायदा तयार करण्यात आला आहे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ या कायद्याच्या दशकपुर्तीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. निवासी उपजिल्हादिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, डॉ. सुचिता शिंदे, एकनाथ बंगाळे, उमाकांत पारधी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, लोकांची सेवा करण्यात एक आनंद आहे. लोकांना सेवा दिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान पाहून आपल्यालाही आनंद होतो. ही अनुभूती महत्त्वाची असते. शासनाने लोकांना प्रत्येक सेवा ही विहित कालमर्यादेत दिली जावी. दिली जाणारी सेवा ही पारदर्शक असावी तसेच ती देतांना सौजन्यशीलता असावी हे अपेक्षित आहे. शासकीय सेवा करतांना आपण ती लोकांच्या सेवेसाठी करीत आहोत ह्याचे भान प्रत्येक शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांनी असू द्यावे,असेही त्यांनी सांगितले.निवासी उपजिल्हाधिकारी खिरोळकर यांनी उपस्थितांना सेवा हक्क दिनाची शपथ दिली.