Jun 23 2025 14:38:50   सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 विश्लेषण

भारताचा हिटमॅन रोहित शर्मा थेट देवेंद्र मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी भेटीला ; नेमकी चर्चा काय झाली?

डिजिटल पुणे    14-05-2025 10:54:14

मुंबई : आंतरराष्ट्रीय कसोटी संघातून निवृत्ती घेतल्यानंतर भारताचा हिटमॅन रोहित शर्माने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. रोहित शर्माने काल वर्षा या निवासस्थानी जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. हि भेट कशासाठी होती? रोहित शर्मा- देवेंद्र फडणवीसांमध्ये नेमकं काय बोलणं झालं याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. रोहितची ‘वर्षा’वर जाण्याची 11 महिन्यांमधील दुसरी वेळ ठरली. यापूर्वी टीम इंडियाने 29 जून 2024 रोजी रोहितच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत टी 20 वर्ल्ड कप उंचावला होता त्यावेळीही तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला वर्षावर बोलवलं होत.

रोहित शर्मा आणि देवेंद्र फडणवीस भेटीबाबत स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली. रोहित शर्मासोबतचे फोटो शेअर करत फडणवीस म्हणाले, ”रोहित शर्मा यांची आज वर्षा निवास्थानी भेट झाली. यावेळी त्यांचं स्वागत केलं. या भेटी दरम्यान विविध विषयांवर चर्चा झाली. तसेच रोहित यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोहितसोबत अनेक विषयांवर संवाद साधला. तसेच रोहितला निवृत्तीनंतर पुढील प्रवासासाठी शुभेच्छाही दिल्या. “वर्षा माझ्या अधिकृत निवासस्थानी भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माचे स्वागत करणं, त्यांना भेटणं आणि त्यांच्याशी संवाद साधून खूप छान वाटलं. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याबद्दल आणि त्यांच्या प्रवासाच्या पुढील टप्प्यात यश मिळावे यासाठी मी त्यांना शुभेच्छा दिल्या”, असं फडणवीस यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलंय.

 

रोहितने 7 मे रोजी कसोटी क्रिकेटच्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली

दरम्यान, रोहित शर्माने 7 मे रोजी कसोटी क्रिकेटच्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकत रोहित शर्माने कसोटीमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. तसेच यापुढे टीम इंडियासाठी वनडे क्रिकेट खेळत राहणार असल्याचं देखील रोहित शर्माने स्पष्ट केले. दुसरीकडे, पाकिस्तान विरुद्धचा तणाव निवळल्यानंतर आयपीएलचे उर्वरित सामने पुन्हा एकदा सुरु होणार आहेत. पुन्हा एकदा आयपीएलच्या 18 व्या मोसमातील उर्वरित 17 सामन्यांचा थरार रंगणार आहे. बीसीसीआयने सोमवारी 12 मे रोजी 17 सामन्यांचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार मुंबई इंडियन्सचा पुढील सामना 21 मे रोजी दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती