मुंबई : T -20 वर्ल्डकप जिंकून मायदेशी परतलेल्या टीम इंडियाची भव्य दिव्या अशी विजयी मिरवणूक मरिन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम पर्यंत पार पडली. लाखोंचा जनसागर मरीन ड्राइव्ह परिसरात गोळा झाला होता. आपल्या लाडक्या क्रिकेटप्रेमींना बघण्यासाठी चाहते चांगलेचा आतुर झाले होते. यानंतर वानखेवर खास कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने मराठीत बोलत चाहत्यांची मने पुन्हा एकदा जिंकून घेतली. आपण वर्ल्डकप जिंकलोय, नाचायला पाहिजे असं रोहित शर्मा म्हणाला.
रोहित शर्माचं खास मराठी संभाषण
वानखेडेतील कार्यक्रम झाल्यानंतर मराठीत बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, “वर्ल्डकप जिंकल्याचा सर्वांनाच फार आनंद झाला आहे. तब्बल ११ वर्षांनंतर वर्ल्डकप ट्रॉफी भारतात आली आहे. त्यामुळे सर्व भारतीय फार खुशीत आहेत. निवृत्ती घेण्याची ही अगदी योग्य वेळ होती. २००७ चा वर्ल्डकप माझ्यासाठी तितकाच स्पेशल होता आणि आताचा हा वर्ल्डकप पण तितकाच खास आहे.असं रोहित म्हणाला. यावेळी त्याला स्टेडियम मध्ये केलेल्या डान्स बाबत विचारलं असता, भारताने वर्ल्डकप जिंकला आहे त्यामुळे आपण नाचायला पाहिजे असं रोहित शर्माने म्हंटल. रोहित शर्माला मराठीत बोलताना पाहून चाहत्यांना सुद्धा आनंद झाला.
रोहित शर्माचा वानखेडेवर गणपती डान्स
दरम्यान, वानखेडे स्टेडियमवर विजयाचा आनंद साजरा करताना टीम इंडियाच्या खेळाडुंनी मैदानाला फेरी मारली. यावेळी ढोलताशांचा आवाज ऐकताच रोहित शर्मा स्वतावर आवर घालू शकला नाही. त्याने चांगलचह ठेका धरला आणि नाचायला सुरुवात केली. त्याच्यापाठोपाठ विराट कोहली आणि इतर भारतीय खेळाडूंनीही नाचायला सुरुवात केली. क्रिकेटप्रेमींना सर्वात जास्त आनंद देणार असं हे दृश्य होते.
रोहितला पाहताच चाहत्यांचा जल्लोष
विक्टरी परेडनंतर वानखेडे मैदानावर खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये टीम इंडियाने वानखेडे स्टेडियममध्ये येताच डान्स केला. राष्ट्रगीत पार पडल्यानंतर कौतुक समारंभाला सुरुवात झाली. रोहित शर्मा त्याच्या संभाषणाला सुरुवात करताच चाहत्यांनी “रोहित रोहित”, अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. चाहते इतके उत्सुक झाले होते की, रोहित शर्माला त्यांना हात दाखवून थांबण्याचा इशारा करावा लागला.
या कार्यक्रमादरम्यान बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, ही ट्रॉफी संपूर्ण भारत देशाची आहे. तसंच वर्ल्डकपचे सामने पाहणाऱ्या सर्व चाहत्यांचे मी आभार मानतो. गेल्या तीन-चार वर्षांपासून आम्ही केलेल्या मेहनतीचे फळ अखेर आम्हाला मिळालं आहे. मला माझ्या माझ्या या टीमचा अभिमान आहे. मी फार लकी आहे की, मी या टीमचा कर्णधार आहे. आम्ही वर्ल्डकप जिंकल्यानंतर कोट्यवधी लोकांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आहे.
रोहितकडून हार्दिक पंड्याचं विशेष कौतुक
वानखेडे स्टेडियममधील कार्यक्रमात बोलताना रोहित शर्माने सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्याचं कौतुक केलं. रोहित म्हणाला की, हार्दिक पांड्याने टाकलेलं षटक निर्णायक ठरलं. त्याचप्रमाणे सूर्यकुमार यादवनेही भन्नाट कॅच घेतला. पांड्याच्या शांत आणि संयमी क्षमतेमुळे भारताला डेव्हिड मिलरला बाद करण्यात मदत झाली. मिलरला टीम जगातील सर्वात धोकादायक खेळाडूंपैकी एक मानत होती.वानखेडे स्टेडियमवर भारतीय खेळाडुंचा सन्मान करण्यात आला.