पुणे : विवेकानंद केंद्राचे जीवनव्रती ज्येष्ठ कार्यकर्ते विश्वास लपालकर यांनी तीस वर्षांत अरुणाचल प्रदेश आणि आसाम या प्रांतात दिलेल्या शैक्षणिक योगदानाचा,अनुभवांचा आढावा घेणाऱ्या 'अरुण रंग' या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवार,दि. १७ ऑक्टोबर २०२४ रोजी पुण्यात संघ परिवारातील मान्यवरांच्या हस्ते झाले . विवेकानंद केंद्र कन्याकुमारी, महाराष्ट्र प्रांत मराठी प्रकाशन विभागाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.डॉ.मनमोहन वैद्य(अ.भा.कार्यकारिणी सदस्य,रा.स्व.संघ ),प्रदीप जोशी(सह प्रचारप्रमुख, रा.स्व.संघ ),भानुदास धाक्रस (अखिल भारतीय महासचिव, विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी) या मान्यवरांच्या हस्ते हे प्रकाशन गणेश सभागृह(न्यू इंग्लिश स्कूल,टिळक रस्ता ) येथे सायंकाळी ५ वाजता झाले.
विश्वास लपालकर यांनी १९८१ ते २०११ या तीस वर्षांत अरुणाचल प्रदेश आणि आसाम या प्रांतात शैक्षणिक उपक्रमांच्या संचालनादरम्यान तेथील जन-जीवनाचा घेतलेला अनुभव आणि त्यांना भेटलेल्या पालकांच्या,विद्यार्थ्यांच्या आठवणी यावर 'अरुण' रंग' हे पुस्तक आधारित आहे.विवेकानंद केंद्राचे जीवनव्रती, पश्चिम बंगाल आणि अंदमान प्रांताचे संघटक म्हणून विश्वास लपालकर यांनी योगदान दिले आहे.डॉ. गो. बं. देगलूरकर,अभय बापट (प्रांत प्रमुख,विवेकानंद केंद्र),किरण कीर्तने( प्रांत संचालक,विवेकानंद केंद्र),सुधीर जोगळेकर(सचिव,विवेकानंद केंद्र कन्याकुमारी, महाराष्ट्र प्रांत मराठी प्रकाशन विभाग) उपस्थित होते. पुस्तकाचे प्रकाशनानंतर श्री.लपालकर यांच्याशी अनौपचारिक गप्पागोष्टीचे आयोजन करण्यात आले . शैलेंद्र बोरकर यांनी सूत्रसंचालन केले.सुधीर जोगळेकर यांनी प्रास्ताविक केले.सुनील कुलकर्णी,सौ.कांचन जोशी यांनी लपालकर यांची प्रकट मुलाखत घेतली
डॉ. मनमोहन वैद्य म्हणाले,' अरुणाचल मध्ये श्री. लपालकर यांच्या सारख्या कार्यकत्यांनी जिद्दीने प्रतिकूल परिस्थितीत योगदान केले.हे पुस्तक वाचून वाचकांच्या मनात ध्येय्य जागृती होऊ शकते. या पुस्तकात अनुभवाचे बोल असल्याने त्याची शक्ती मोठी आहे.कार्यकर्त्यांच्या योगदानामुळे समाज समृद्ध होतो. समाजाला काही ना काही देत राहणे, हाच धर्म आहे. उपासना वेगळी असू शकते. हाच विचार भारताचा प्राण आहे. भारतातील समाज हा धर्मावर टिकलेला आहे. आध्यात्मिकता जागवून भारत घडवायचा आहे. त्यातून जीवन सार्थक होईल.
भानुदास धाक्रस यांनी विवेकानंद केंद्राच्या कार्यात जीवनव्रतींचे योगदान उलगडून सांगितले. ते म्हणाले,'राष्ट्र बलशाली करण्याचे व्रत प्रत्येकाने घेतले पाहिजे. स्वामी विवेकानंदांचे विचार सर्वत्र पोहोचवले पाहिजे. त्याग, सेवा करीत मार्गक्रमण करावे.'
विश्वास लपालकर म्हणाले,'युवकांसाठी महाविद्यालयात काम करण्याची प्रेरणा एकनाथ रानडे यांनी दिली.अरुणाचल मध्ये लोकांचे मन फार मोठे आहे. त्याचा पदोपदी अनुभव घेतला आणी तिथेच काम करण्याचे ठरवले.विवेकानंद केंद्राच्या कामात लवचिकता आहे आणि आत्मीयता आहे.सातत्याने प्रवास करून कष्टप्रद काम केले कारण विवेकानंद केंद्रासाठी घराघरात प्रार्थना होते. विवेकानंद केंद्राचे काम समाजामुळेच उभे आहे.'
प्रदीप जोशी म्हणाले,' कार्यकर्त्याच्या जीवनातील प्रसंगांचे पुस्तक होणे, ही महत्वपूर्ण घटना आहे. कोणताही डोंगराळ प्रदेशातील समाज आपल्या पासून वाटतो तितका दूर नाही,हे या पुस्तकातून लक्षात येते.या समाजाची प्रगती होताना पाहिली की निरलस कार्यकर्त्यांनी केलेल्या योगदानाची कल्पना येते. त्यातून सकारात्मक, सृजनात्मक शक्ती उभी राहत आहे. कार्यकर्त्यांची सर्वसमावेशकता अशा कामात उपयोगी पड़ते.
बलशाली समाज निर्मितीसाठी संस्कारक्षम ग्रंथ निर्मिती विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागातर्फे केली जाते, अशी माहिती सुधीर जोगळेकर यांनी दिली. अरुण रंग हे या प्रकाशन विभागाचे १६६ वे पुस्तक आहे, असेही त्यांनी सांगितले.७५ व्या वषा वर्षात पदार्पण केल्याबद्दल प्रदीप जोशी यांच्या हस्ते श्री. लपालकर आणि सौ. सुजाता लपालकर यांचा सत्कार केला.स्वामी विवेकानंद यांच्या समग्र चरित्राच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशनही करण्यात आले