सातारा : राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल सातत्याने अपमानास्पद वक्तव्ये केली जात आहेत. याबाबतच भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या लोकांवर आळा घालण्यासाठी दहा वर्षांची शिक्षा आणि ‘नसबंदी’ करण्यासाठी कायदा आणला जावा, अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली आहे. आज साताऱ्यातील पत्रकार परिषदेत उदयनराजे यांनी प्रशांत कोरटकरने यांनी संभाजी महाराज यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याबाबत भाष्य केले.
पत्रकार परिषदेत बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले की, माझ्या सरकारकडे तीन मागण्या केल्या आहेत. सिनेमॅटिक लिबर्टीवर कायदा आणावा, असा कायदा करून बेताल वक्तव्य करणाऱ्यांना दहा वर्षे शिक्षा करावी आणि राज्यात सिनेमॅटिक लिबर्टीवर कायदा आणावा. यासाठी समिती नेमण्यात यावी, तसेच शासनमान्य इतिहास समोर आणल्यास लोकांची नसबंदीच होऊन जाईल. यावेळी कोरटकविषयी बोलताना विकृत लोकांना कोणती जात पक्ष नसतो, असे उदयन राजे म्हणाले.
पुढे बोलताना, कोणाला कोणत्याही प्रकारचे संरक्षण असले तरी एखाद्याची मानसिकता झाली की मेलो तरी चालेल पण याला खलास करणार तर कोणीही रोखू शकत नाही, अशी वेळ येऊ देऊ नका असा इशारा त्यांनी दिला. यासह औरंगजेब याच्यावरून बोलताना, “औरंगजेब काही देव नव्हता, तो इथला नव्हता. शिवाजी महाराजांनी धर्मस्थळ जपण्याचे काम केले. यांनी विरोधात काम केले, मग यांची समाधी कशाला जपायची? तो लुटेरा होता, चोर होता. ” उदयनराजे म्हणाले.
दरम्यान, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या बद्दल गरळ ओकणाऱ्या प्रवृत्तींवर कठोर कारवाई व्हावी आणि शासनाने या विषयावर गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केली.