मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सवर 5 गडी राखून शानदार विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. 2025 मध्ये पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकणाऱ्या RCB ने यंदाही जेतेपद कायम राखत इतिहास रचला आहे.
मात्र, या विजयानंतर चाहत्यांमध्ये विजयी मिरवणुकीबाबत उत्सुकता असताना संघ व्यवस्थापनाने महत्त्वाचे संकेत दिले आहेत. गेल्या वर्षी बंगळुरूमधील विजय सोहळ्यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर यंदा सार्वजनिक विजयी मिरवणूक आयोजित केली जाणार नसल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
RCB ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर चाहत्यांसाठी विशेष संदेश शेअर केला आहे. संघाने चाहत्यांचे अभिनंदन करत हा आनंद घरी आणि सुरक्षित वातावरणात साजरा करण्याचे आवाहन केले आहे. तसेच पुढील हंगामात स्टेडियममध्ये भेटण्याचे आश्वासन देत चाहत्यांनी संघाला पाठिंबा कायम ठेवावा, असे म्हटले आहे.
संघाच्या या संदेशामुळे बंगळुरूमध्ये किंवा एम. चिन्नास्वामी स्टेडियम परिसरात यंदा कोणतीही मोठी विजयी रॅली आयोजित केली जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. RCB च्या या निर्णयामागे सुरक्षा आणि चाहत्यांच्या हिताला प्राधान्य दिल्याचे मानले जात आहे.