मुंबई : राज्यभर पावसाने जोरदार हजेरी लावली असून कोकण, मुंबई महानगर परिसर आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी दुपारी ४ वाजेपर्यंत रेड अलर्ट जारी केला असून या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. याशिवाय पुणे जिल्ह्यातील घाटमाथा, सातारा आणि कोल्हापूरच्या डोंगराळ भागातही अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मुंबईत सकाळपासूनच पावसाचा जोर कायम असून अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. गोरेगाव फिल्म सिटी रोडवरील संतोष नगर परिसरात दोन ते तीन फूट पाणी साचल्याने हा मार्ग तात्पुरता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. मालाड सबवेमध्येही सुमारे एक फूट पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला असून परिसरात मोठी कोंडी निर्माण झाली आहे. पाणी साचल्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ठाणे शहरातही मुसळधार पावसामुळे अनेक सखल भाग जलमय झाले आहेत. मुख्य बाजारपेठ, वंदना डेपो, मासुंदा तलाव परिसर, कोपरी आणि बारा बंगला भागात पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली. महापालिका प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेत आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत.
पालघर जिल्ह्यात सलग सुरू असलेल्या पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. रानशेत आणि दाभोण परिसरातून वाहणाऱ्या सुसरी नदीला पूर आला असून काही सखल भागांमध्ये पाणी शिरल्याची माहिती आहे. दुसरीकडे, समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठीही रेड अलर्ट जारी केला आहे. रायगड आणि सिंधुदुर्गसह कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट लागू असून पुढील ७२ तासांत काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भातील सहा जिल्ह्यांसाठीही ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, पाण्याने भरलेल्या रस्त्यांवरून प्रवास टाळावा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.