मुंबई : राज्यातील काही भागांत गेल्या काही दिवसांत मुसळधार पाऊस झाला असला, तरी एकूण चित्र पाहता अनेक जिल्ह्यांमध्ये अद्यापही सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. विशेषतः खानदेशातील धुळे, नंदुरबार, मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, सोलापूर तसेच पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा तुटवडा कायम असल्याने खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, 8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांत पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असून ही परिस्थिती पुढील दहा दिवस कायम राहू शकते. या काळात अनेक भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असून कमाल तापमानातही वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यातही पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना सावधगिरीचा सल्ला दिला आहे. ज्या भागांत अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही, तेथील शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण होईपर्यंत पेरणीची घाई करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
1 जून ते 7 जुलै या कालावधीत देशभरात सरासरीच्या 89 टक्के पावसाची नोंद झाली आहे. तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा किंचित अधिक, म्हणजे 101 टक्के पाऊस झाला आहे. राज्यात यंदा 279.4 मिमी पावसाची नोंद झाली असून, सरासरी 277.7 मिमी इतकी आहे.
विभागनिहाय पाहता, कोकणात 117 टक्के आणि मध्य महाराष्ट्रात 107 टक्के पावसाची नोंद झाली आहे. मात्र, विदर्भात केवळ 89 टक्के आणि मराठवाड्यात फक्त 71 टक्के पाऊस झाल्याने या भागांतील परिस्थिती चिंताजनक मानली जात आहे. 8 जुलैनंतर पावसात आणखी घट होण्याचा अंदाज असल्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील खरीप पिकांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.