दिल्ली : नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे. कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी)च्या शिष्टमंडळासोबत सविस्तर चर्चा झाल्याचे सांगत, त्यांच्या मागण्या सरकारकडे सादर करण्यात आल्याची माहिती नड्डा यांनी दिली.
जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आज सीजेपीने संसदेकडे मोर्चाची हाक दिली होती. त्याआधीच दिल्ली पोलिसांनी परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवत बॅरिकेडिंग केले आणि अनेक आंदोलकांना जंतरमंतर परिसरातच रोखले. मात्र, काही समर्थक संसद भवन परिसरात पोहोचल्याने सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली.
'शांततेत चर्चा झाली, आंदोलन थांबवा'
प्रसारमाध्यमांशी बोलताना जे.पी. नड्डा म्हणाले की, आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी सकारात्मक वातावरणात चर्चा झाली असून त्यांनी आपल्या मागण्या सरकारसमोर मांडल्या आहेत. सकाळी सुमारे 11.50 वाजल्यापासून चर्चेची प्रक्रिया सुरू होती. दुपारी आंदोलकांनी अधिकृत निवेदनही सादर केले. आता आंदोलन मागे घेऊन जनजीवन सुरळीत करण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
आंदोलकांच्या प्रमुख मागण्या
आंदोलकांनी सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत.
सोनम वांगचुक यांची तातडीने सुटका करावी.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा.
आत्महत्या केलेल्या सर्व NEET परीक्षार्थ्यांच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी.
'दोन तास वाट पाहायला लावलं, फक्त दहा मिनिटांची भेट'
दरम्यान, सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, चर्चेसाठी बोलावूनही जे.पी. नड्डा यांनी शिष्टमंडळाला तब्बल दोन तास प्रतीक्षा करायला लावली आणि त्यानंतर केवळ दहा मिनिटांचीच भेट दिली.सौरभ दास यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सर्व खासदारांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले. तसेच शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.