पुणे : खडकवासला धरणातील पाण्याचा विसर्ग कमी करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. आज (शुक्रवार) सकाळी ८ वाजल्यापासून धरणातून सुरू असलेला ९,४०५ क्युसेक विसर्ग कमी करून ४,७०८ क्युसेक करण्यात आला आहे. धरणातील आवक आणि पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन पुढील काळात विसर्गात पुन्हा बदल होऊ शकतो, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सध्या खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, धरणसाखळीतील एकूण पाणीसाठा २२.८८ टीएमसी (७८.४९ टक्के) इतका झाला आहे. पानशेत धरणात ८२.२९ टक्के, वरसगावमध्ये ७६.८८ टक्के, तर टेमघरमध्ये ६१.६८ टक्के पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी धरणसाखळीतील पाणीसाठा २३.६० टीएमसी (८०.९८ टक्के) होता.
गेल्या २४ तासांत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला असून टेमघर येथे १७७ मिमी, पानशेत १०८ मिमी, वरसगाव १०३ मिमी आणि खडकवासला येथे २९ मिमी पावसाची नोंद झाली. या कालावधीत चारही धरणांमध्ये मिळून २,३१६ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाल्याची माहिती कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली.
दरम्यान, मुठा नदीतील पाण्याची पातळी बदलू शकत असल्याने नदीपात्रात उतरू नये, नदीकाठावरील जनावरे, साहित्य आणि इतर वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाने नागरिकांना केले आहे.