नवी दिल्ली : नीट पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई आणि परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या मागण्यांसाठी जवळपास 26 दिवस उपोषण केलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी अखेर उपोषण मागे घेतले आहे. मध्यरात्री केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती एक्सवरील पोस्टद्वारे दिली.
उपोषण मागे घेतल्यानंतर सोनम वांगचुक यांनी व्हिडीओ संदेशातून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, सरकारकडून शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नाही. मात्र, या विषयावर संसदेत चर्चा होईल, असे सांगण्यात आले.
वांगचुक म्हणाले, "माझ्यासमोर फक्त दोनच पर्याय होते—उपोषण सुरू ठेवून जीव धोक्यात घालणे किंवा मिळालेल्या आश्वासनांसह संघर्ष पुढे सुरू ठेवणे. हजारो लोकांनी माझे आयुष्य महत्त्वाचे असल्याचे सांगितले. त्यामुळे जिवंत राहून लढा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला."
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. उलट, त्याचा राजकीय परिणाम संबंधितांनाच भोगावा लागेल, असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल होऊ नयेत, ही आपल्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीने मात्र आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचे पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकारने मान्य केलेल्या प्रमुख मागण्या
20 जुलैच्या आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवर कोणतेही गुन्हे दाखल केले जाणार नाहीत.
पेपरफुटी आणि परीक्षा व्यवस्थेतील सुधारणा या विषयांवर संसदेत चर्चा केली जाईल.
नीट पेपरफुटीशी संबंधित आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याबाबत विचार केला जाईल.