नवी दिल्ली / मुंबई : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रीय राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीने दिल्लीला बोलावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत विविध राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा पार पाडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुपारी सोलापूरहून दिल्लीकडे रवाना झाले. काही वेळातच ते राजधानीत पोहोचल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, त्यांच्या दिल्ली दौऱ्याचा नेमका अजेंडा किंवा केंद्रीय नेतृत्वासोबत कोणत्या विषयावर चर्चा होणार आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून पुढील राजकीय आणि प्रशासकीय रणनीती निश्चित केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत फडणवीस यांची दिल्ली भेट महत्त्वाची मानली जात आहे.
दरम्यान, नीट परीक्षा आणि कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक झाले असून रविवारी मुंबईत ठाकरे बंधूंनी तिरंगा मार्चची हाक दिली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्यातील राजकीय हालचालींना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
याचदरम्यान, देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या राजकारणात जाणार असल्याच्या चर्चांवर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पंढरपुरात प्रतिक्रिया देताना, "आम्हाला महाराष्ट्रातच राहायचं आहे. मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार," असे स्पष्ट विधान केले होते.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सुरू झालेल्या या घडामोडींमुळे दिल्लीतील बैठकीत कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले जातात आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यामागील कारण काय आहे, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.