नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जंतर-मंतरवरील आंदोलनकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. काॅकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी याला आंदोलनाचा मोठा विजय असल्याचे सांगत, "सरकारसमोर झुकलो नाही म्हणूनच हा राजीनामा शक्य झाला," असा दावा केला.
राजीनाम्याची माहिती मिळताच दिपके यांनी आनंद व्यक्त करत जंतर-मंतरवर गुडघ्यावर बसून आंदोलनाच्या यशाचा क्षण साजरा केला. "या सरकारमध्ये कोणी राजीनामा देत नाही, असे सांगितले जात होते. मात्र लोकशाहीच्या ताकदीने आम्ही ते करून दाखवले. सरकारसमोर न झुकल्यास मोठमोठ्या पदांवरील लोकांनाही जबाबदारी स्वीकारावी लागते," असे ते म्हणाले.
मात्र, प्रधान यांच्या राजीनाम्यानंतरही आंदोलन मागे घेणार नसल्याचे दिपके यांनी स्पष्ट केले. आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत, आंदोलनादरम्यान कारवाई करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई आणि विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी त्यांनी पुन्हा केली.
दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शनिवारी सकाळी एका कार्यक्रमात सत्ताधाऱ्यांनी संवादावर भर द्यावा, तरुणांच्या प्रश्नांना उत्तर द्यावे आणि केवळ आदेश देण्याची भूमिका योग्य नसल्याचे मत व्यक्त केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर काही तासांतच धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई करत राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या (NTA) ४७ अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली असून, परीक्षाव्यवस्थेत व्यापक सुधारणा करण्याची घोषणा सरकारने केली आहे. तसेच प्रश्नपत्रिका फुटीला आळा घालण्यासाठी तांत्रिक यंत्रणा अधिक मजबूत करण्याबरोबरच यूपीएससीच्या 'प्रतिभा सेतू' पोर्टलद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.