मुंबई : मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या मुद्द्यावरून पुन्हा आंदोलनाचा इशारा देणारे मनोज जरांगे यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे, त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले असून प्रलंबित प्रकरणांची संख्या अत्यल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अद्याप कोणत्याही नागरिकाला अडचण असल्यास सरकार चर्चा करून मार्ग काढण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मराठा समाजाच्या हितासाठी महायुती सरकारने यापूर्वीच्या सरकारांच्या तुलनेत अधिक निर्णय घेतल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. उर्वरित प्रश्नांवरही सकारात्मक चर्चा करून तोडगा काढला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
नागपूरमधील पावसाच्या परिस्थितीवर बोलताना त्यांनी सायंकाळनंतर मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली. शहरातील काही विकासकामे सुरू असल्यामुळे काही भागांत पाणी साचल्याचे त्यांनी सांगितले. अल्पावधीत अतिवृष्टी झाल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्यास मर्यादा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पीक विमा योजनेबाबत येणाऱ्या तक्रारींवर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, एक रुपयाच्या पीक विमा योजनेमुळे मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली होती. मात्र, पडताळणीत गैरप्रकार आढळल्याने कारवाई करण्यात आली असून त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या कमी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना त्यांनी युवकांच्या हितासाठी केंद्र सरकारने अनेक निर्णय घेतल्याचा दावा केला. परीक्षा पेपरफुटी रोखण्यासाठीचे विधेयक मंजूर झाल्यास विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले.
नीट पेपरफुटी प्रकरणी मुंबईतील आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेले जमावबंदीचे गुन्हे मागे घेण्यात येतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या नावाने लावण्यात आलेल्या कथित बॅनरमागील संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.