छत्रपती संभाजीनगर : कॉक्रोच जनता पार्टी (CJP) ने आगामी काळातील आपल्या जनआंदोलनाची रूपरेषा जाहीर केली आहे. पक्षाचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी सप्टेंबरपासून देशभरात 'क्या बोलती पब्लिक' ही जनसंपर्क मोहीम सुरू करण्याची घोषणा केली. या मोहिमेद्वारे नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि विविध सार्वजनिक प्रश्न थेट जाणून घेत त्यावर जनआंदोलन उभारले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत बोलताना दिपके यांनी दावा केला की, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनामुळे सरकारला माघार घ्यावी लागली. हा केवळ एका मंत्र्याचा राजीनामा नसून नागरिकांच्या आवाजाचा विजय असल्याचे त्यांनी म्हटले. यापुढेही सरकारला जनतेच्या प्रश्नांवर उत्तरदायी धरण्यासाठी CJP रस्त्यावर उतरेल, असा इशाराही त्यांनी दिला.
दिपके यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करताना संविधान, लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय या मूल्यांवर पक्षाची वाटचाल सुरू राहणार असल्याचे सांगितले. शिक्षण, बेरोजगारी, न्यायव्यवस्था, लोकशाही संस्था आणि माध्यमांची स्वायत्तता हे पक्षाच्या आगामी आंदोलनाचे प्रमुख मुद्दे असतील, असे त्यांनी नमूद केले.
'क्या बोलती पब्लिक' मोहिमेअंतर्गत कार्यकर्ते देशभर दौरे करून नागरिकांशी थेट संवाद साधतील. देशातील तरुणांच्या शिक्षण, रोजगार आणि भविष्याशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य दिले जाईल, असे दिपके यांनी सांगितले. सध्याच्या शिक्षण व्यवस्थेतील वाढत्या शुल्कामुळे शिक्षण सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याची टीकाही त्यांनी केली.
बेरोजगारीच्या मुद्द्यावर बोलताना उच्चशिक्षित युवकांना अपेक्षित रोजगार मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तरुणांना त्यांच्या पात्रतेनुसार संधी मिळाव्यात, यासाठी सरकारने ठोस धोरण राबवावे, अशी मागणीही त्यांनी केली.
यावेळी पक्षाचे नेते सौरव दास यांनी CJP ची सदस्य नोंदणी मोहीम सुरू होत असल्याची घोषणा केली. विद्यार्थी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांनी पक्षाशी जोडावे, असे आवाहन करत सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या मोहिमेतून देशभरातील जनतेचे प्रश्न ऐकून व्यापक जनआंदोलन उभारले जाईल, असे त्यांनी सांगितले.