पुणे : अमली पदार्थांच्या अवैध तस्करीविरोधात मोठी कारवाई करत अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने (एएनटीएफ) पुणे आणि धुळे जिल्ह्यांत जप्त करण्यात आलेल्या तब्बल ९,५३६ किलो अमली पदार्थांची कायदेशीर आणि पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावली आहे. नष्ट करण्यात आलेल्या अमली पदार्थांची अंदाजित किंमत १२ कोटी २९ लाख रुपयांहून अधिक असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथील अधिकृत प्रकल्पात जप्त अमली पदार्थांचा नाश करण्यात आला. तर धुळे जिल्ह्यात विविध कारवायांदरम्यान जप्त करण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणातील गांजाचाही समावेश या प्रक्रियेत होता. संपूर्ण प्रक्रिया कायद्याच्या नियमांनुसार आणि पर्यावरणाची काळजी घेत पूर्ण करण्यात आली.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, उच्चस्तरीय ड्रग डिस्पोजल समिती (एचएलडीडीसी) मार्फत ३,१५१ किलो, तर घटकस्तरीय ड्रग डिस्पोजल समिती (आरडीडीसी) मार्फत ६,३८५ किलो अमली पदार्थ नष्ट करण्यात आले. अशाप्रकारे एकूण ९,५३६ किलो अमली पदार्थांची सुरक्षित विल्हेवाट लावण्यात आली.
एएनटीएफच्या या कारवाईमुळे अमली पदार्थांच्या तस्करीवर मोठा आघात झाला असून राज्यातील अंमली पदार्थविरोधी मोहिमेला आणखी बळ मिळाले आहे. भविष्यातही अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.