मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिक, कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना दर्जेदार व अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून आरोग्य सुविधांचा विस्तार ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत परळ येथील महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटलसह राज्यातील १० नव्याने सुरू करण्यात आलेल्या दंत शल्यक्रिया विभाग आणि नवजात शिशु अतीव दक्षता विभागाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले, “आरोग्य सेवा ही केवळ उपचारापुरती मर्यादित नसून ती समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी आहे. प्रत्येक रुग्णाला सन्मानाने, संवेदनशीलतेने आणि गुणवत्तापूर्ण सेवा मिळाली पाहिजे. डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी आणि सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त प्रयत्नातूनच निरोगी समाजाची उभारणी शक्य आहे.”
ते पुढे म्हणाले की, राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर आहे. आधुनिक तंत्रज्ञान, सक्षम मनुष्यबळ आणि दर्जेदार आरोग्य सेवा यांच्या माध्यमातून उपचार व्यवस्था अधिक प्रभावी करण्याचे काम सुरू आहे. नव्याने सुरू झालेले दंत शल्यक्रिया विभाग आणि नवजात शिशु अतीव दक्षता विभाग हे रुग्णांसाठी मोठे वरदान ठरणार असून विशेषतः नवजात बालकांना तातडीचे आणि गुणवत्तापूर्ण उपचार स्थानिक स्तरावर उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.तसेच उत्तर प्रदेशाच्या धर्तीवर राज्यातील सर्व रुग्णालयातील सर्व माहिती १५ ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री आबिटकर यांनी आरोग्य सेवा बजावणारे विविध विभाग, डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी आणि सेवाभावी संस्थांच्या योगदानाचे कौतुक केले. समाजहितासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम केल्यास आरोग्य क्षेत्रात सकारात्मक परिवर्तन घडवून आणता येते, असे सांगत त्यांनी ऑनलाइन माध्यमातून कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचेही आभार मानले.
आमदार सीमाताई हिरे (यांनी दूरदृष्य प्रणाली द्वारे) आणि आमदार चित्रा वाघ यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी राज्य कामगार विमा सोसायटीचे संचालक अशोक थोरात यांनी प्रास्ताविक करून नव्या विभागांची माहिती दिली. या सोहळ्याचे दूरद्ष्य प्रणालीद्वारे उद्घाटन वरळी, कांदिवली, मुलुंड, वाशी, पुणे, नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील रुग्णालयांशी जोडून करण्यात आले. कार्यक्रमास राज्य कामगार विमा सोसायटीचे आयुक्त रमेश चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी फाळके, नगरसेवक किरण तावडे तसेच वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.