पुणे : वडापाव घेताना पाय लागल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या घटनेत छातीवर मार लागलेल्या २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यातील गणेश पेठ परिसरात घडली. शिवम राजेश परदेशी असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी वैभव किशोर साळुंखे (वय २४) याला ताब्यात घेतले आहे.
गणेश पेठेतील डुल्या मारुती चौकात दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. शिवम वडापाव घेण्यासाठी टपरीवर गेला होता. त्यावेळी गर्दीत त्याचा पाय वैभवला लागला. याच कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर वाद वाढत जाऊन दोघांमध्ये हाणामारी झाली. या झटापटीत शिवमच्या छातीवर मार लागल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.
हाणामारीनंतर शिवम घरी परतला आणि झोपी गेला. मात्र, रात्री त्याला जाग आली नाही. कुटुंबीयांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
प्राथमिक तपासानुसार छातीला झालेल्या दुखापतीमुळे शिवमचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच फरासखाना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर वैभव साळुंखे याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेमागील नेमका घटनाक्रम आणि मृत्यूचे कारण याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.किरकोळ कारणावरून झालेल्या वादाला गंभीर स्वरूप आल्याने गणेश पेठ परिसरात या घटनेची चर्चा सुरू आहे.