पुणे : जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे साडेनऊ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याच्या धक्कादायक घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. चिमुकलीला सायकल शिकवण्याच्या बहाण्याने आरोपी तिला घरापासून सुमारे दीड ते दोन किलोमीटर अंतरावरील निर्जन परिसरात घेऊन गेल्याची माहिती समोर आली आहे.
घटना घडलेला परिसर अत्यंत निर्मनुष्य असून एका बाजूला घनदाट ऊसशेती, तर दुसऱ्या बाजूला ओढा आहे. या भागात नागरिकांची वर्दळही कमी असते. त्यामुळे आरोपीने याच ठिकाणाचा गैरफायदा घेतल्याचे तपासातून समोर येत आहे. घटनास्थळापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर मुख्य रस्ता असल्याची माहिती आहे.
चिमुकलीला सायकल शिकण्याची इच्छा असल्याचे हेरून आरोपीने तिला ‘चल, तुला सायकल शिकवतो’ असे सांगत घराबाहेर नेल्याची माहिती आहे. त्यानंतर घडलेल्या या अमानुष घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे.
आरोपीला कठोर शिक्षेची ग्रामस्थांची मागणी
घटनेची माहिती समोर आल्यानंतर पिंपळवंडीतील ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला. आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा मिळावी आणि चिमुकलीला न्याय मिळावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला.
आरोपी पोलिसांच्या ताब्यात
या प्रकरणातील संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. घटनेचा सखोल तपास करून आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
‘फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा’ – सुनेत्रा पवार
या घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून तपासाचा आढावा घेतला. प्रकरणाची पारदर्शक आणि सखोल चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा मिळावी, यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची विनंती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.
पीडित कुटुंबाच्या पाठीशी शासन
पीडित कुटुंबाच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचेही सुनेत्रा पवार यांनी सांगितले. त्या लवकरच पिंपळवंडी येथे जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.या घटनेमुळे परिसरात सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी जोर धरत आहे.