पुणे : पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील रेश्मा उर्फ देवयानी पारधे यांनी अंगणवाडी मधील वाटाणा आणि भरडा शिजत नसल्याची माहिती सोशल मीडियावर दिली होती. तो व्हिडिओ व्हायरल झाला. याबाबत त्यांनी यापूर्वी संबंधिताना माहिती तक्रार दिलेलीच होती. असे असताना निष्क्रिय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र सोशल मीडियावरील या पोलखोल करणाऱ्या अंगणवाडी सेविकेवर कारवाई करून तिला निलंबित केले होते. आता ती कारवाई मागे घेतल्याचे बातम्यांमधून कळते आहे.
प्रशासनाचे हे धोरण खरे तर चोराला पाठीशी घालणारेच आहे. ज्या पुरवठादाराने हा पुरवठा केला तसेच ज्या अधिकाऱ्यांनी याची दर्जा तपासणी केली त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक असताना या साखळीतील शेवटच्या व्यक्तीला जबाबदार ठरवायचे आणि आपण मात्र नामनिराळे राहायचे असे धोरण सातत्याने वरिष्ठ अधिकारी राबवत असतात.
अनेक ठिकाणी अंगणवाडी सेविका तसेच प्राथमिक शाळा शिक्षक, स्वच्छता कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी सातत्याने सुविधांविषयी तक्रार करत असतात. परंतु याकडे दुर्लक्ष केले जाते. पण दुर्घटना झाल्यावर मात्र त्यांना जबाबदार धरले जाते. वरिष्ठ पातळीवरची जबाबदारी आणि उत्तरदायित्व टाळणे ही गंभीर बाब आहे. पण याला सत्ताधारी पाठीशी घालतात असे दिसत असल्यामुळे या सरकारचे गव्हर्नन्स म्हणजे न शिजणारा वाटाणा म्हणावे लागेल.
मुकुंद किर्दत, प्रवक्ते, आम आदमी पार्टी