अहिल्यानगर : महाराष्ट्राच्या मातीतील इतिहास, प्राचीन वास्तू आणि सांस्कृतिक वारशाच्या पाऊलखुणा शोधत त्या नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे मोलाचे काम करणारे अहिल्यानगरचे अतुल शेषेराव थोरात यांच्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे. शिर्डी येथील बी द चेंज फाऊंडेशनतर्फे त्यांना प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६’ जाहीर झाला असून, ६ सप्टेंबर रोजी शिर्डी येथे त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
काळाच्या पडद्याआड गेलेल्या अनेक ऐतिहासिक वास्तू, दुर्लक्षित किल्ले, प्राचीन मंदिरे, लेणी आणि पुरातन स्थळांचा शोध घेत अतुल थोरात महाराष्ट्राचा विस्मृतीत जाणारा इतिहास पुन्हा लोकांसमोर आणत आहेत. प्रत्यक्ष स्थळांना भेटी देऊन तेथील शिलालेख, पुरावे, वास्तुकला आणि स्थानिकांच्या आठवणींचा आधार घेत ते इतिहासाचा वेध घेतात.
विशेष म्हणजे, इतिहास केवळ पुस्तकांच्या पानांमध्ये बंदिस्त न राहता तो सर्वसामान्यांच्या मोबाईलपर्यंत आणि नव्या पिढीच्या मनापर्यंत पोहोचावा, यासाठी थोरात सोशल मीडिया आणि यूट्यूबचा प्रभावी वापर करत आहेत. त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक ठेवा नव्या पिढीला नव्याने परिचित होत आहे.“वारसा जपायचा असेल तर तो आधी समजून घ्यावा लागतो आणि समजून घ्यायचा असेल तर तो लोकांपर्यंत पोहोचवावा लागतो,” या विचाराने प्रेरित होऊन थोरात यांचे कार्य सुरू आहे.
त्यांच्या याच सातत्यपूर्ण आणि अभ्यासपूर्ण योगदानाची दखल घेत बी द चेंज फाऊंडेशनने ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६’साठी त्यांची निवड केली आहे. या सन्मानामुळे इतिहासप्रेमी आणि सांस्कृतिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून, विविध स्तरांतून अतुल थोरात यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.विस्मृतीत जाणारा इतिहास शोधून, तो डिजिटल माध्यमातून जगासमोर आणणाऱ्या अतुल थोरात यांचा हा सन्मान म्हणजे महाराष्ट्राच्या वारसा जतनाच्या चळवळीचाही गौरव मानला जात आहे.