म्हाळुंगे : म्हाळुंगे-नांदे रस्त्याची दुरवस्था आणि अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. बुधवारी (२ सप्टेंबर) रात्री दुचाकी घसरून झालेल्या अपघातात श्रीहरी व्ही. (वय २८, रा. केरळ) या तरुणाचा मृत्यू झाला. रात्री सुमारे ११.१८ वाजता हा अपघात घडला.
श्रीहरी हे व्हिटीपी अल्पाईन परिसरात वास्तव्यास होते. रात्री दुचाकीवरून जात असताना म्हाळुंगे-नांदे रस्त्यावर त्यांची दुचाकी घसरली. त्यानंतर समोरून येणाऱ्या वाहनाला धडक बसल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पावसामुळे चिखल, रात्री रस्त्यावर अंधार
मुसळधार पावसामुळे रस्त्यावर चिखलाचा मोठा थर साचला आहे. यासोबतच अनेक ठिकाणी पथदिवे बंद असल्याने रात्री वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज घेणे कठीण जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. चिखलामुळे दुचाकी घसरण्याचा धोका वाढला असून, प्रकाशव्यवस्थेअभावी परिस्थिती आणखी गंभीर होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
काही दिवसांतच पुन्हा अपघात
याच भागात काही दिवसांपूर्वी एका ११ वर्षीय मुलाचा दुचाकी घसरून अपघात झाला होता. आता पुन्हा एका तरुणाचा जीव गेल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रस्त्यांची खराब अवस्था आणि आवश्यक सोयींचा अभाव यामुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
“आणखी किती जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार?”
अपघाताच्या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रस्त्यावरील चिखल तातडीने हटवणे, रस्त्याची दुरुस्ती करणे आणि बंद असलेले पथदिवे त्वरित सुरू करणे, या उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.“आणखी किती जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे.