पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हलगर्जी प्रकरणामध्ये आता रुग्णालय प्रशासनाने आपली बाजू स्पष्ट केली आहे. माध्यमांना रुग्णालय प्रशासनाने निवेदन देत आपली भूमिका स्पष्ट आहे. प्रशासनाने दिलेले निवेदन खालीलप्रमाणे:
दिनांक: ४ एप्रिल २०२५
माननीय महोदय,
या प्रकरणाच्या अनुषंगाने खालील तज्ञांची समिती स्थापन करून आमचा अहवाल तयार केला आहे.
१. वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर,
२. डॉ. अनुजा जोशी (वैद्यकीय अधीक्षक),
३. डॉ. समीर जोग (अतिदक्षता विभाग प्रमुख),
४. श्री. सचिन व्यव्हारे (प्रशासन)
त्यांनी रुग्णाच्या जुने केस पेपर्स, सध्याचे पेपर्स, संबंधित डॉक्टर यांचे जबाब नोंदवून घेतले.
१. सौ. भिसे ईश्वरी सुशांत (वृत्तपत्रात प्रसारित झालेले नाव तनिषा भिसे) MRD 1034063. या २०२३ पासून रुग्णालयात वेळोवेळी उपचार व सल्ला घेतला गेला होता.
२. सदर महिलेची २०२२ साली दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ५०% चॅरिटीचा लाभ घेऊन शस्त्रक्रिया झाली होती.
३. २०२३ साली या रुग्णाला सुरक्षित गर्भधारणेची शक्यता नसल्याने मुल दत्तक घेण्याचा सल्ला देण्यात आला होता.
४. सर्व रुग्णालयांमध्ये असा नियम असतो की आई व बाळाच्या सुरक्षिततेसाठी प्रसूतीपूर्व तपासणी (ANC) कमीत कमी ८ वेळा करणे आवश्यक असते. ती त्यांनी नियमितपणे केली नाही व त्यांचा या रुग्णालयास माहिती नाही.
५. १५ मार्च रोजी इंडीरा IVF चे रिपोर्ट घेऊन त्या डॉक्टर घैसास यांना भेटल्या. अतिशय जोखमीच्या व धोका निर्माण करणाऱ्या गर्भधारणेबाबत डॉक्टर घैसास यांनी त्यांना माहिती दिली. दर ७ दिवसांनी तपासणीस बोलावले. त्याप्रमाणे त्यांना २२ बोलावले होते परंतु त्यांनी त्यास प्रतिसाद दिला नाही.
दिनांक: २८ मार्च २०२५, सकाळी ११:३० वाजता रुग्ण सौ. भिसे ईश्वरी सुशांत, पती व नातेवाईक डॉक्टर घैसास यांच्याकडे बाह्यरुग्ण विभागात (OPD) दाखल झाले. ते Emergency मध्ये अथवा Labour Room मध्ये आले नाहीत.
डॉक्टर घैसास यांनी तातडीने तपासणी केली. त्यावेळी ती नॉर्मल होती व तिला कुठल्याही तातडीच्या उपचाराची गरज नव्हती. पण जोखमीची अवस्था लक्षात घेता Observation साठी भरती होण्याचा सल्ला दिला. तसेच प्रेग्नन्सी व सी सेक्शन च्या धोक्याबाबत माहिती दिली. तसेच नवजात गर्भकक्षाच्या डॉक्टरांशी भेट करून देण्यात आली. तसेच या उपचारामध्ये १०-२० लाख रुपये लागतील याची माहिती दिली. रुग्णाच्या नातेवाईकांनी तुम्ही भरती करून घ्या व आम्ही प्रयत्न करतो असे सांगितले.
यावेळी त्यांची अडचण समजून घेऊन डॉ. केळकर यांनी रुग्णांच्या नातेवाईकांच्या इच्छेप्रमाणे जेवढे भरता येतील म्हणजेच २-२.५ लाख मी डॉ. घैसास यांच्याशी बोलतो असे सांगितले. हाच सल्ला श्री सचिन व्यवहारे यांनी त्यांच्या दूरच्या नातेवाईकांना फोनवरून दिला. पण जेव्हा डॉक्टरांचे ऑपरेशन संपले व त्यांनी डॉ. घैसास यांना फ़ोन केला तेंव्हा रुग्ण न सांगता निघून गेल्याचे सांगितले. डॉ. घैसास यांना रुग्णाचे नातेवाईक पैशांची तजवीज करत असतील असे वाटले. त्यामुळे त्यांनी तजवीज न झाल्यास ससून येथे त्यांचे चांगले उपचार होतील असे सुचवले. मात्र रुग्णांच्या नातेवाईकांकडून काहीच हालचाल न झाल्याने डॉक्टरांनी रुग्णाच्या पतीला फ़ोन केला पण त्यांनी उचलला नाही. यावेळी एका नर्सने नातेवाईक बॅग उचलून निघून गेल्याचे सांगितले. त्यामुळे २८ मार्चच्या दुपारनंतर काय झाले याची रुग्णालय प्रशासनास काहीच कल्पना नव्हती.
त्यानंतर पुणे मिरर या वृत्तपत्रातील बातमीप्रमाणे रुग्ण वाकड येथील सूर्या हॉस्पिटल येथे २८ मार्च सायंकाळी ५:३० वाजता दाखल झाल्या व २९ मार्च रोजी सिझेरियन झाले. रुग्ण ह्या दीनानाथ येथून स्वतःच्या गाडीने गेल्या. तसेच सूर्या हॉस्पिटल येथे पूर्वीच्या शस्त्रक्रियेची व कॅन्सरची माहिती दिली नाही असे समजते.
सदर चौकशीनंतर व रुग्णाच्या इतर संबंधित gynaecologist यांच्या opinion नुसार आमच्या समितीचा निष्कर्ष खालीलप्रमाणे:
१. सदर रुग्णाची Twin Pregnancy धोकादायक होती.
२. रुग्ण नियमित ANC चेकअपसाठी पहिल्या सहा महिन्यात रुग्णालयात आली नाही.
३. Advance मागितल्याच्या रागातून तक्रार केलेली दिसते.
रुग्णालय प्रशासनाने जाहीर केलेल्या या निवेदनामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. रुग्णालय प्रशासनाने घेतलेली भुमिका योग्य आहे का? रुग्णांकडून उपचार घेण्यात विलंब झाला का? या सर्व गोष्टींची चौकशी निःपक्षपातीपणे होणार का? असे प्रश्न सर्वांना पडत आहेत.


