नवी दिल्ली: भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर पाकिस्तानमध्ये अस्थिरतेचं चित्र दिसून येत आहे. पाकिस्तानचा लष्करप्रमुख असीम मुनीरला ताब्यात घेण्यात आलं असून, त्याची पदावरून उचलबांगडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक नागरिक आणि सत्ताधारी वर्गामध्ये असा विश्वास आहे की, असीम मुनीरच्या एकहाती निर्णयशक्ती आणि आक्रमक धोरणांमुळेच पाकिस्तान युद्धाच्या उंबरठ्यावर आला आहे. त्यामुळे असीम मुनीरवर देशद्रोहाचा खटला चालवण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. आता यावर निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी मोठं वक्तव्य केलंय.
पाकिस्तानमध्ये असीम मुनीर संदर्भात जे काही घडतंय ते अत्यंत महत्त्वाचे असून दाट शक्यता आहे की त्यांना नजर कैदेत ठेवण्यात येईल, असा अंदाज कर्नल अभय पटवर्धन यांनी व्यक्त केला आहे. पाकिस्तानी आर्मीचे अतिवरिष्ठ अधिकारी आणि आयएसआय मधील धुसफुसही यासाठी कारणीभूत असू शकते, असेही अभय पटवर्धन यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानने गुरुवारी रात्री भारताच्या अनेक शहरांमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण भारतीय लष्कारांनी त्यांना हवेतून परतवून लावले. भारताकडून पाकिस्तानातील इस्लामाबाद, लाहोर येथे हल्ले केले गेले, तर कराची बंदरावरही हल्ले चढवले. यावेळी या हल्ल्यातील एक बॉम्ब पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर पडला आहे तर पाकिस्तानी सैन्यप्रमुख आसीम मुनीर यांच्या घराशेजारी स्फोट झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
जानेवारी २०२३ मध्ये राजौरीमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार, एप्रिल २०२३ मध्ये भारतीय सैन्याच्या ताफ्यावर हल्ला, जून २०२४ मध्ये वैष्णोदेवी मंदिराकडे जाणाऱ्या बसवर हल्ला, ऑक्टोबर २०२४ मध्ये सोनमर्ग बोगद्यात काम करणाऱ्या मजुरांवर हल्ला, या सगळ्या दहशतवादी कारवायांमागे मुनीर मास्टरमाईंड होते. असीम मुनीर फक्त पाकिस्तानी सेनाप्रमुखच नाही. तर एक कॉर्पोरेट नेताही आहे.
पाकिस्तानमधील घडामोडी पाहता शक्यता आहे की, पहलगाममधील हल्ला आणि त्यानंतर भारतासोबत निर्माण झालेला तणाव यासाठी असीम मुनीरला जबाबदार ठरवून बळीचा बकरा बनवलं जाईल. असीम मुनीरला सर्व गोष्टीसाठी जबाबदार ठरवून पाकिस्तानी सरकार व पाकिस्तानी सैन्य नामनिराळा होईल, असा अंदाज कर्नल पटवर्धन यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, ऑपरेशन सिंदूरनंतर चिडलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय सुरक्षा यंत्रणांनी त्याचे सर्व हल्ले यशस्वीरित्या परतवले आहेत. विशेषतः एस-400 एअर डिफेन्स सिस्टीममुळे पाकिस्तानचा हा हल्ला निष्फळ ठरला. पाकिस्तानकडून भारताच्या 15 शहरांवर करण्यात आलेला हवाई हल्ला एस-400 प्रणालीने उलथवून लावला. काल रात्री भारतीय वायुदलाने पाकिस्तानातून आलेल्या क्षेपणास्त्रांचा आणि ड्रोनचा यशस्वी पद्धतीने नायनाट केला. यामध्ये भारताच्या ‘सुदर्शन चक्र’ नावाच्या एअर डिफेन्स युनिटने निर्णायक भूमिका बजावली. भारतीय संरक्षण यंत्रणांच्या माहितीनुसार, एस-400 प्रणालीने पाकिस्तानकडून आलेली सर्व क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हवेतच उडवून लावले.