इस्लामाबाद : भारत- पाकिस्तानमध्ये झालेल्या संघर्षामुळे दोन्ही देशांतील तणाव शिगेला पोहचला होता. पण १० मे ला युद्धविरामाची घोषणा कऱण्यात आली आणि तणाव काही प्रमाणात निवळला. या संघर्षादरम्यान भारतीय सैन्याकडून पाकिस्तानातील अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. पण पाकिस्तानकडून या नुकसानीबाबत कोणतीही माहिती जाहीर करण्यात आली नव्हती. पण या संघर्षादरम्यान पाकिस्तानमध्ये झालेल्या नुकसानीचा तपशील समोर आला आहे.
युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर दोन-तीन दिवसांनी पाकिस्तानने भारतीय सैन्याकडून झालेल्या मिसाईल हल्ल्यांच्या नुकसानीची माहिती दिली आहे. पाकिस्तानने हल्ला केल्यानंतर भारताच्या प्रत्युत्तर कारवाईत त्यांचे ११ सैनिक मारले गेल्याचे आणि ७८ सैनिक गंभीर जखमी झाल्याचे मान्य केलं आहे. याशिवाय, गोळीबारात ४० नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. विशेष बाब म्हणजे, भारतीय क्षेपणास्त्र हल्ल्यात पाकिस्तानी हवाई दलाचेही मोठे नुकसान झाल्याचेही पाकिस्तानकडून मान्य करण्यात आले आहे.
इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR)च्या माहितीनुसार, भारतीय लष्कराने पाकिस्तानविरोधात केलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये १०० दहशतवादी मारले गेले. त्यानंतर झालेल्या कारवाईत पाकिस्तानी लष्कराचे ४० सैनिक आणि अधिकारी मारले गेले आहेत. पाकिस्तानी माध्यमांनुसार, आजच (१३ मे) पाकिस्तानी लष्कर आणि भारतीय सैन्कांमध्ये नुकत्याच झालेल्या संघर्षात लष्करी आणि नागरिकांच्या हानीची अधिकृत माहिती जाहीर केली. ६ आणि ७ मे रोजी भारतीय कारवाईला प्रत्युत्तर म्हणून ‘ऑपरेशन बुनयान-अन-मार्सास’ दरम्यान देशाचे रक्षण करताना ११ सैनिक शहीद झाले आणि ७८ जवान जखमी झाले.
आयएसपीआरकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, भारतीय हल्ल्यात नाईक अब्दुल रहमान, नाईक वकार खालिद, लान्स नाईक दिलावर खान, इक्रामुल्ला, शिपाई आदिल अकबर आणि शिपाई निसार हे सहा लष्करी जवान शहीद झाले आहेत. भारतीय हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी हवाई दलाचेही मोठे नुकसान झाले आहे. भारतीय हवाई हल्ल्यात हवाई दलाचे पाच अधिकारी शहीद झाले आहेत. त्यामध्ये स्क्वॉड्रन लीडर उस्मान युसूफ, चीफ टेक्निशियन औरंगजेब, सिनियर टेक्निशियन नजीब, सिनियर टेक्निशियन मुबाशिर आणि कॉर्पोरल टेक्निशियन फारूक यांचा समावेश आहे.