मुंबई : पाकिस्तान विरुद्धची युद्धजन्य परिस्थिती आता कुठे थांबली असतानाच मुंबईतुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येत्या २ दिवसांत मुंबईत बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. इ मेलच्या माध्यमातून हि धमकी मिळालीय. राज्याच्या डिजास्टर मॅनेजमेंट रूमला हा मेल आला असून सोमवार ते बुधवारदरम्यान सतर्क रहा असं या मेलमध्ये म्हंटलं आहे. महाराष्ट्र नियंत्रण कक्षाकडून मुंबई पोलिसांना यासंदर्भात माहिती देण्यात आलेली आहे. धमकीच्या या मेल नंतर मुंबई पोलीस सतर्क झाली असून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु आहे.
याबाबत मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसांत बॉम्बस्फोट होण्याची चेतावणी देणारा एक निनावी ईमेल महाराष्ट्र पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाला आहे . या मेलमध्ये कोणतीही विशिष्ट वेळ किंवा ठिकाणाचे नाव सांगितलेलं नाही, पण लवकरच स्फोट होईल. कृपया दुर्लक्ष करू नका, असा मजकूर ई-मेलमध्ये नमुद करण्यात आला आहे. या धमकीनंतर मुंबईत एकच खळबळ उडाली असून पोलीस यंत्रणा ऍक्शन मोड मध्ये आली आहे. या संपूर्ण प्रकाराचा तपास पोलीस करत आहेत. तसेच हा धमकीचा मेल कोणी पाठवला आहे याचा शोध घेण्याचं कामही पोलिसांकडून सुरु आहे. सध्या पोलीस सदर ईमेल आयडी ट्रॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत.
दरम्यान, मुंबई हि कायमच अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर राहिली आहे. १९९३ चा साखळी बॉम्बस्फोट असो वा २६/११ चा हल्ला असो…. मुंबईलाच दहशदवाद्यांकडून लक्ष्य केलं जाते हा इतिहास आहे. त्यामुळेच पाकिस्तान विरुद्व तणाव वाढला असतानाच मुंबईत सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सरकारी आस्थापना, संवेदशील ठिकाणे व धार्मिक स्थळे, परदेशी वकिलाती व रेल्वे स्थानकांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. संवेदनशील ठिकाणी बॉम्ब शोधक व नाशक पथक तपासणी करीत आहे.
हा धमकीचा मेल आपत्ती व्यवस्थापनाच्या कंट्रोल रुमला आला आहे. याच मेलच्या अनुषंगाने सोमवार ते बुधवार या काळात सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. धमकीच्या मेलमुळे सगळीकडे सध्या खळबळ उडाली आहे. सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे. असे असतानाच हा मेल आल्यामुळे सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. कोणतीही चूक होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. युद्धबंदी असल्यामुळे सीमा भागातील राज्यांमध्ये सध्या तरी परिस्थिती पूर्वपदावर येत आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमधील आदमपूर येथील एअरबेसला भेट दिली आहे. यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूरमधील जवानांचे कौतुक करुन सैन्याचे मनोबल वाढवले आहे. तसेच भारतीय वायू दलाने हल्लाही केला आणि रक्षण केले. शत्रूच्या हल्लामध्ये आपल्या एअर डिफेन्सला धक्काही पोहचला नाही. तुमच्या पराक्रमामुळे ऑपरेशन सिंदूरचे यश जगभरात पोहोचले. ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याबद्दल मी देशाच्या सशस्त्र सलाम करतो. येणाऱ्या पिढीसाठी तुम्ही प्रेरणा ठरला आहात. भारत गौतम बुद्धांची आहे तशीच गुरु गोविंदसिंग यांची देखील भूमी आहे. प्रत्येक नागरिक जवानांसोबत आहेत.भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याचा एकच परिणाम म्हणजे विनाश असेल हे दहशतवाद्यांना आणि त्यांच्या मालकांना समजले असेल. पाकिस्तानचे अनेक प्रयत्न प्रत्येकवेळेस अपयशी ठरले” अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूरमध्ये व्यक्त केल्या आहेत.