नवी दिल्ली: भारताच्या ईशान्येकडील राज्य अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे बदलण्याचा चीनकडून पुन्हा एकदा प्रयत्न करण्यात आला आहे. चीनच्या भारताविरुद्ध कुरघोड्या अजूनही कायम आहेत. एकीकडे पाकिस्तान विरुद्धची युद्धजन्य परिस्थिती आता कुठे आटोक्यात आल्यानंतर आता ईशान्य भारतात चीन भारताचा मागे हात धुवून लागलाय. भारत- चीन बॉर्डर वरील अरुणाचल प्रदेशातील काही जागांवर चीनने दावा ठोकला आहे. एवढंच नव्हे तर काही ठिकाणांची नावेही बदलण्याचा नापाक कृत्य चीन कडून करण्यात आलं आहे. भारतानेही चीनच्या या कृत्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. चीनचे हे निरर्थक प्रयत्न सत्य बदलू शकत नाहीत, असं म्हणत भारताने ठणकावलं आहे. नेमकं घडलं तरी काय ते सविस्तर पाहुयात.
तर भारत आणि चीनमधील सीमेला प्रत्यक्ष नियंत्रण रेषा म्हणतात. मॅकमोहन रेषा भारताच्या अरुणाचल प्रदेशला तिबेटपासून वेगळे करते. परंतु चीन हे मान्य करत नाही आणि अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचं चीन सांगत असते. चीन अरुणाचल प्रदेशला झंगनान म्हणतो, आता तर चीनने सर्व हद्द पार करत अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावेच परस्पर बदलून टाकली आहेत. यापूर्वीही २०२४ मध्ये, चीनने अरुणाचल प्रदेशातील विविध ठिकाणांच्या ३० नवीन नावांची यादी प्रसिद्ध केली होती जी भारताने स्पष्टपणे नाकारली. आताही भारताने चीनला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनच्या या एकतर्फी कृतीवर कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटले, चीनकडून अरुणाचल प्रदेशमधील काही ठिकाणांची नावे बदलण्याचा निरर्थक, हास्यास्पद आणि प्रक्षोभक प्रयत्न केला जात आहे. भारत याला कधीही मान्यता देणार नाही. आम्ही आमच्या सैद्धांतिक भूमिकेशी पूर्णपणे एकनिष्ठ आहोत.
चीनने यापूर्वीही 2024 मध्ये अरुणाचलमधील 30 ठिकाणांची नावे बदलून नवीन यादी प्रसिद्ध केली होती, ज्यावर भारताने तीव्र नाराजी व्यक्त करत ती यादी फेटाळून लावली होती. चीन अरुणाचल प्रदेशवर आपला दावा सांगत अनेक वेळा भारतीय नेत्यांच्या दौऱ्यावरही आक्षेप घेत असतो. मात्र भारताने नेहमीच ठामपणे सांगितले आहे की अरुणाचल प्रदेश हा भारताचा भाग आहे आणि त्यावर कोणताही वादच नाही.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी यापूर्वी स्पष्टपणे सांगितले होते की, 'जर मी तुमच्या घराचे नाव बदलले, तर ते माझे होईल का?' हे वक्तव्य चीनच्या भूमिकेवर अचूक प्रत्युत्तर होते. त्यांनी हा मुद्दा उचलून धरताना म्हटले होते की, 'चीनच्या नकाशात नावं बदलून काहीही साध्य होणार नाही. वास्तव बदलत नाही.'
भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनच्या अशा कुरापतींवर लक्ष वेधले असून जागतिक समुदायालाही सूचित केले आहे की चीन सातत्याने सीमावाद उकरून काढून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे.चीनची ही राजकीय खेळी फक्त मानसिक युद्धाचे एक साधन आहे, ज्याद्वारे ते आंतरराष्ट्रीय लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र भारत यापुढेही ठामपणे आणि शांततेच्या मार्गाने आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करत राहणार आहे.