श्रीनगर- दहशतवादासाठी तुमच्या जमिनीचा वापर नको, हाच पाकिस्तानला संदेश आहे. दहशतवाद्यांना पोसणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, अशा इशारा केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिला. ते श्रीनगरच्या दौऱ्यावर आल्यानंतर सैनिकांशी बोलत होते.
ऑपरेशन सिंदूरनंतर प्रथमच केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी श्रीनगरला भेट दिली. त्यांनी सैनिकांशी संवाद साधला. राजनाथ सिंह म्हणाले, भारत आता दहशतवाद सहन करणार नाही. शत्रूला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं जाईल. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संताप आहे. दहशतवाद्यांनी आमच्या लोकांना त्यांचा धर्म विचारु गोळ्या घातल्या. आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना प्रत्युत्तर दिलं. ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूरची कारवाई ही सर्वात मोठी कारवाई होती. या कृतीवरून सरकार केवळ कठोर निर्णय घेत नाही तर त्यांची अंमलबजावणीदेखील करत असल्याचं सिद्ध होते.
राजनाथ सिंह यांनी दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला कडक शब्दात इशारा दिला. केंद्रीय संरक्षणमंत्री म्हणाले, पाकिस्ताननं नेहमीच भारताचा विश्वासघात केला आहे. दहशतवाद आणि चर्चा एकत्र असू शकत नाही. पाकिस्ताननं दहशतवाद्यांना आश्रय देणं थांबवावं. दहशतवाद थांबला नाही तर पाकिस्तानला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
हुतात्मा झालेल्या सैनिकांना नमन आहे. संपूर्ण देशाला सैनिकांचा गर्व आहे. हाच संदेश घेऊन येथं मी आलो आहे. आपल्या सैन्याचा निशाणा अचूक आहे, हे जगाला माहित आहे. आपली सेना हल्ला करते, तेव्हा मृतदेह मोजण्याचं काम शत्रू करतो. कुठेही लपले तरी दहशतवाद्यांना सोडणार नाही-केंद्रीय संरक्षण मंत्री, राजनाथ सिंह
पाकिस्तानला भारतानं दिला इशारा-पाकिस्ताननं नेहमीच भारताला दगा दिला आहे. आमच्या माथ्यावर वार केला. आम्ही त्यांची छाती फोडली आहे. विश्वासघाताची जबर किंमत पाकिस्ताननं मोजली आहे. पाकिस्तान कर्जात बुडाला आहे, त्याविषयी काय बोलणार? पाकिस्तान जिथे जातो, तिथे देणेकऱ्यांची रांग लागते. सीमेपलीकडून हल्ला झाला तर युद्ध मानलं जाईल. अण्वस्त्रच्या हल्ल्याला भारत घाबरणार नाही, असा सूचक इशारा राजनाथ सिंह यांनी दिला.