नवी दिल्ली : दहशतवादाला खतपाणी घालून पहलगाममध्ये रक्तपात करणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवत ‘ऑपरेशन सिंदूर’मधून भारताने दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करून टाकले. यानंतर आता पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर घेरण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दहशतवाद्यांचा खात्मा भारताने केल्यानंतर पाकिस्तान अंतरराष्ट्रीय मंचावर फेक नरेटीव्हच्या माध्यमातून ‘व्हिक्टीम कार्ड’ खेळू पाहत आहे. पाकिस्तानच्या खोट्या प्रचाराचा पर्दाफाश करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने मोहीम हाती घेतली आहे. विशेष म्हणजे या मोहिमेसाठी मोदी सरकार काँग्रेसचे खासदार शशी थरुर, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंवर विशेष जबाबदारी सोपवली आहे. याबद्दलचे पत्रकच जारी करण्यात आले आहे.
पहलगाम आणि ऑपरेशन सिंदूरवर भारताची भूमिका मांडण्यासाठी परदेशात जाणाऱ्या खासदारांच्या शिष्टमंडळांचे 7 जण नेतृत्व करतील. शशी थरूर - युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, विजयंत जय पांडा - पूर्व युरोप, कनिमोझी - रशिया, संजय झा - दक्षिण पूर्व आशिया, रविशंकर प्रसाद - मध्य पूर्व, सुप्रिया सुळे - पश्चिम आशिया, श्रीकांत शिंदे - आफ्रिकन देश हे सात जण शिष्टमंडळांचे नेतृत्व करणार आहेत.
कारवाईला विरोधी पक्षांकडूनही पूर्ण पाठिंबा : पहलगाम दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून एक कडक संदेश दिलाय. या निर्णायक कारवाईला केवळ जनतेकडूनच नव्हे तर विरोधी पक्षांकडूनही पूर्ण पाठिंबा मिळत आहे. देशातील राजकीय पक्षांच्या विचारसरणी वेगवेगळ्या असू शकतात, परंतु जेव्हा देशाच्या सुरक्षेचा आणि दहशतवादाविरुद्ध एकतेचा प्रश्न येतो तेव्हा संपूर्ण राजकीय नेतृत्व एका सुरात उभे असल्याचे दिसून आले.
अनेक देशांमध्ये शिष्टमंडळ पाठवले जाणार : आता भारताची ही राजकीय एकता जगभर दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका मांडण्यासाठी खासदारांचे एक शिष्टमंडळ 8 वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवले जाणार आहे. संसदीय कामकाज मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली हे प्रयत्न सुरू आहेत, ज्यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने ही योजना तयार केली आहे. पहिल्या टप्प्यात 7 गट तयार करण्यात आले आहेत, जे प्रत्येक गट वेगवेगळ्या देशांना भेट देईल. या गटांमध्ये सर्व पक्षांच्या खासदारांचा समावेश केला जातोय, जेणेकरून हे स्पष्ट होईल की दहशतवादाविरुद्ध भारताची लढाई केवळ सरकारची नाही तर संपूर्ण देशाची आहे.
उद्देश काय असेल? : प्रत्येक शिष्टमंडळात सुमारे अर्धा डझन खासदार असतील आणि सर्व राजकीय पक्षांचे नेते त्यामध्ये नेतृत्वाची भूमिका बजावतील. या खासदारांचे उद्दिष्ट आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर हे स्पष्ट करणे असेल की, पाकिस्तानमध्ये वाढलेल्या दहशतवादी संरचनांनी भारताच्या सार्वभौमत्वावर कसा हल्ला केला आहे आणि त्याला भारताने संयम आणि दृढनिश्चयाने कसे उत्तर दिले आहे. या 7 शिष्टमंडळांचा उद्देश परदेशी सरकारे, थिंक टँक, मीडिया संस्था आणि धोरणकर्त्यांना हे सांगणे असेल की भारताला ही सुडाची कारवाई का आणि कशी करण्यास भाग पाडले गेले. तसेच भारताने कोणत्याही देशाच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन केले नाही तर आपल्या नागरिकांच्या संरक्षणासाठी उभा राहिला.
22 मेनंतर खासदारांचे शिष्टमंडळ परदेश दौऱ्यावर जाण्यास सुरुवात करेल. मिळालेल्या माहितीनुसार, परदेशात जाणाऱ्या शिष्टमंडळात सुमारे 43/45 खासदारांची नावे समाविष्ट केली जातील. प्रेमचंद गुप्ता- आरजेडी, संजय झा-जेडीयू हे जपानला जाणार आहेत. रविशंकर प्रसाद-भाजप हे मध्यपूर्वेत जाणार आहेत. विजयंत जय पांडा- भाजप, अनुराग ठाकूर- भाजप, ब्रिजलाल- भाजपा, तेजस्वी सूर्या- भाजपा, अपराजिता सारंगी- भाजपा, राजीव प्रताप पी रुडी- भाजपा, श्रीकृष्ण श्री रुडी- भाजपा, श्रीकांत शिंदे- शिवसेना, सुप्रिया सुळे- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), सस्मित पात्रा- (बीजेडी), समिक भट्टाचार्य- (भाजपा), मनीष तिवारी- (काँग्रेस), शशी थरूर- काँग्रेस, अमरसिंह- काँग्रेस, प्रियांका चतुर्वेदी- शिवसेना उद्धव, जॉन बिट्स- सीपीआय एम, असदुद्दीन ओवैसी या खासदारांचा शिष्टमंडळात समावेश आहे.