अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्यानंतर राज्यातील कौटुंबिक हिंसाचारामुळं आत्महत्यांच्या घटना उघडकीस आल्या आहेत. वैष्णवीच्या आत्महत्यानंतर महाराष्ट्रातून एक संतापाची भावना पाहायला मिळाली. या प्रकरणानंतर अहिल्यानगरमध्ये मराठा समाजातील जाणकारांनी एकत्र येत समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा बंद करत सामाजिक सलोखा आणि साधेपणा जपण्याचा संदेश बैठकीतून दिला आहे.
पुण्यात वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर शाही विवाह सोहळे, हुंडा, मानपान, लग्नातले दिखावे याचीही चर्चा सुरू झाली. यावर अहिल्यानगरमधील मराठा समाजाने अत्यंत पुरोगामी पाऊल उचलत समाजातून हुंडा हद्दपार करण्याचा विडा उचलला आहे. तसेच लग्नातल्या बडेजावाला काट मारणारी एक आचारसंहिताच जाहीर केली आहे.
पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्येनंतर खडबडून जागा झालेल्या मराठा समाजातल्या विचारवंतांनी अहिल्यानगरात एक बैठक घेत अतिशय महत्त्वपूर्ण आणि पुरोगामी पाऊल उचललं. लग्न साध्या पद्धतीने करा, हुंडा प्रथा बंद करा, प्रीवेडींग शूट बंद करा असे काही नियम या आचारसंहितेत घालून देण्यात आले आहेत. आचारसंहितेचं पालन करणाऱ्या पालकांचा समाजातर्फे जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. तसंच आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी 11 जणांची सुकाणू समितीही स्थापन करण्यात आली आहे.
अलीकडं तीन-चार दिवस लग्न सोहळे चालतात. त्यात श्रीमंतीचं प्रदर्शन केलं जातं. प्री-वेडिंगची पद्धत आली आहे. त्यावर लाखोंचा खर्च होतो. डिजेतून ध्वनी प्रदूषण केलं जातं. मानपान-भाषणे यामुळं लग्न उशिरा लागतात. लग्नसमारंभात व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते सोन्याचे दागिने भेट दिली जातात. या पद्धतींमुळं लोक कर्जबाजारी झाले आहेत. एवढे करूनही मुलींचा छळ होतो आणि अनेक संसार मोडतात. त्यामुळं समाजानं जागे होऊन या अनिष्ट प्रथा मोडण्याची आणि छळ करणाऱ्यांना ठिकाणावर आणण्याची गरज आहे, असं हभप तनपुरे महाराज यांनी बैठकीत सांगितलं.
"मराठा समाजाच्या लग्नसमारंभात वर-वधूंच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची आरती केली जाते. यावरही बैठकीत आक्षेप घेण्यात आला. आरतीमुळं छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य झाकोळले जाते. त्यांना देव बनविणं चुकीचं आहे. त्याऊलट त्यांनी दिलेला आदर्श जपणं आवश्यक आहे. आरतीत काय म्हटलं हे कुणालाही समजत नाही", असं मत सीए राजेंद्र काळे यांनी व्यक्त केलं.
मराठा समाजाने विवाह समारंभासाठी आचारसंहिता जाहीर केली आहे. हुंडा घेऊ नका, देऊ नका, तसेच लग्नात डिजे व प्री-वेडिंगला बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विवाह सोहळा केवळ १०० ते २०० लोकांच्या उपस्थितीत पार पाडावा यासह काही महत्त्वाचे निर्णय मराठा समाजाने घेतले आहेत. आचारसंहितेचे पालन उत्कृष्टपणे करणाऱ्या तीन पालकांचा समाजातर्फे जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. तसेच आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी ११ जणांची सुकाणू समिती देखील स्थापन करण्यात आली आहे.
मराठा समाजाने घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असून समाजाने देखील आता जुन्या अनिष्ट रूढी, परंपरा बंद करत हुंडा देणं घेणं, त्याचप्रमाणे प्री-वेडिंग आणि लग्नाच्या अनावश्यक खर्चांना टाळावे असं आवाहन समाजातील वरिष्ठांनी केलं आहे. यावेळी माजी कुलगुरु डॉ. सर्जेराव निमसे म्हणाले, "लग्नसोहळ्याच्या आचारसंहितेची जनजागृती घेण्यासाठी कीर्तनकार, प्रबोधनकारांनी पुढाकार घ्यावा. हुंडाबळी याबरोबरच समाजातील ग्रामीण मुलांच्या विवाहाचीही समस्या मोठी आहे. यावरही गांभीर्याने विचार करावा लागेल."
मराठा समाजाच्या लग्न समारंभासाठी आचारसंहिता
1. लग्न सोहळा (100/200) मर्यादित लोकात केला जावा.
2. प्री-वेडिंग प्रकार बंद करावा. केलाच तर तो लग्न सोहळ्यात जाहीर दाखवू नये.
3. कसल्याही परिस्थितीत लग्न वेळेवरच लावावे.
4. लग्नात डीजे नको.पारंपरिक वाद्य, लोक कलावंतांना संधी द्या.
5. कर्ज काढून लग्नात खर्च करू नये. मराठा समाजात लग्नाच्या कर्जामुळेच अनेक आत्महत्या झालेल्या आहेत.
6. नवरदेवापुढे दारू पिऊन नाचणाऱ्या तरुण-तरुणींना पायबंद घालावा.
7. हार घालताना नवरा नवरीला उचलू नका.
8. लग्नात फक्त वधूपिता आणि वर पिता यांनीच फेटे बांधावेत. पाहुण्यांचे फेटे आणि इतर सत्कार बंद करावेत.
9. लग्न, वाढदिवस, उद्घाटन कार्यक्रमात, पुस्तके, झाडाची रोपे किंवा रोख स्वरूपात आहेर करावेत.
10. लग्नात प्रमुख व्यक्तीच्या हस्ते सोन्याचे दागिने, गाडीच्या चाव्या, वस्तू देऊ नयेत. देखावा करू नये.
11. लग्नात हुंडा देऊ-घेऊ नये. वडिलांची खूपच इच्छा असेल तर मुलीच्या नावावर एफडी करावी.
12. लग्न, साखरपुडा, हळद एकाच दिवशी करा.
13. लग्नानंतर मुलीच्या आईने मुलीच्या संसारात ढवळाढवळ करू नये. मोबाईलचा वापर गरजेपुरताच करावा.
14. पैशासाठी सूनेचा छळ करू नये.
15. समाजातील नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या ऐपतीप्रमाणे आर्थिक मदतीचा हात द्यावा. नुसत्या शुभेच्छा नकोत.
16. जेवणात 5 हून अधिक पदार्थ नकोत.
17. विविध कार्यक्रमानिमित्त होणाऱ्या भोजन प्रसंगी अन्नाची नासाडी टाळण्यासाठी, सुकी भोजन पाकीट व्यवस्था असावी.
18. दशक्रिया विधी पाचव्या दिवशी करा. लग्न आणि दशक्रिया विधीला मान्यवरांचे आशीर्वाद, श्रद्धांजली हा कार्यक्रम बंद करावा. श्रद्धांजलीसाठी गरज वाटल्यास वेगळा विशेष कार्यक्रम घ्यावा.
विशेष म्हणजे असेच नियम याआधी आगरी समाजानेही तयार केले आहेत. कोकणातही सर्व समाजांच्या लग्नात कित्येक पिढ्या हुंडा, देणीघेणी, मानपान होत नाहीत. तसंच लग्नाचा खर्चही अर्धा अर्धा केला जातो. आता मराठा समाजानेही आचारसंहिता निर्माण करून फुकटच्या बडेजावाला पायबंद घातलाय ही खरोखर स्वागतार्ह बाब आहे.