पुणे : मेट्रो स्टेशन बांधण्याच्या कारणास्तव शिवाजीनगर बस स्टॅन्ड पाडण्यात आले आणि तात्पुरते स्टॅन्ड जुन्या पुणे मुंबई हायवे वर हलवण्यात आले आता त्याला तब्बल पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. या मेट्रो स्टेशन संदर्भात महा मेट्रो आणि एसटी महामंडळ यांच्यामधील करारा सुद्धा सहा वर्ष झाली आहे. ही सर्व दिरंगाई केवळ व्यापारी संकुलावर डोळा ठेवणाऱ्या काही हितसंबंधी लोकांमुळेच होते आहे असा आरोप आम आदमी पक्षाचे मुकुंद किर्दत यांनी केला आहे.
पूर्वीच्या शिवाजीनगर बस स्थानकाची जमीन मेट्रो ने वापरली त्या बदल्यात नवीन बस स्थानक बांधून देण्याचे पूर्वीच्या करारात ठरले होते. परंतु मध्यवर्ती भागातील मोक्याची जागा व्यापारी उद्देशासाठी वापरता येईल या कारणास्तव याचे बांधकाम पुढे झाले नाही. याबाबतही नव्याने करार करणे अपेक्षित होते. 2023 मध्ये शशी प्रभू आर्किटेक्ट यांचे कडून एसटी स्थापत्य विभागाने नकाशे मागवले व त्यानुसार बांधकाम केले जाईल असे एसटी महामंडळाच्या विद्या बिलारकर यांनी सांगितले होते. परंतु त्यात पुन्हा अडकाठी केली गेली व आता मेट्रो हे बांधकाम करेल असे ठरवण्यात आले. या संदर्भात स्थानिक आमदार शिरोळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अनेकदा मोठ्या घोषणा केल्या.
परंतु आजअखेर यासंदर्भात कुठलाही करार झालेला नाही तसेच कुठलाही अधिकृत बांधकाम नकाशा तयार केला नाही अशी स्पष्ट माहिती पुणे मेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ यांनी भेटीत दिल्याचे मुकुंद किर्दत यांनी सांगितले.
या जागेवरती व्यापारी संकुल बांधण्यात अनेकांना रस असल्यामुळेच पुणेकरांचे, बाहेरगावच्या प्रवाशांचे हाल झाले तरी चालतील , विलंब झाला तरी चालेल असे धोरण राबवले जात आहे असा आरोप आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी केला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खुलासा करावा अशी मागणी आम आदमी पार्टी ने केली आहे.
- आम आदमी पार्टी