बंगळुरू : भारताचा दिग्गज क्रिकेटपटू आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा आयकॉन खेळाडू विराट कोहलीच्या अडचणीत वाढ झाली आहे. एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी भारतीय क्रिकेटपटू आणि आयपीएल 2025 विजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा खेळाडू विराट कोहली याच्याविरुद्ध कब्बन पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ज्येष्ठ समाजसेवक एच.एम. वेंकटेश यांनी विराट कोहलीविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आता या तक्रारीवरुन पोलीस कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असून विराट कोहलीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
आयपीएलचं जेतेपद जिंकल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या चाहत्यांनी बंगळुरू शहरात मोठ्या उत्साहात विजय साजरा केला. मात्र या आनंदाला काळोखाची किनार लागली, जेव्हा स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हजारो चाहते एकत्र आले होते आणि स्टेडियमबाहेर अचानक गोंधळ निर्माण झाला. अफवा आणि व्यवस्थेचा अभाव यामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर आरसीबीचा दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या
मंगळवार 3 जून रोजी अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं पंजाब किंग्जचा पराभव केला आणि अशा प्रकारे पहिल्यांदाच आयपीएलचं विजेतेपद जिंकलं. या विजयानंतर संपूर्ण बेंगळुरुमध्ये जल्लोषाचं वातावरण होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा संपूर्ण संघ अहमदाबादहून ट्रॉफी घेऊन परतला तेव्हा बंगळुरूमध्ये एक अद्भुत परिस्थिती होती आणि रस्त्यावर चाहत्यांची मोठी गर्दी होती. यादरम्यान, प्रथम कर्नाटक सरकारनं विधानसभेजवळ संघाचा विजय साजरा केला आणि नंतर संपूर्ण संघ चिन्नास्वामी स्टेडियममध्ये गेला, जिथं मोठ्या संख्येनं चाहते आधीच उपस्थित होते.
या कार्यक्रमादरम्यान स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली, ज्यात 11 जणांचा मृत्यू झाला, तर सुमारे 50 चाहते जखमी झाले. तेव्हापासून संपूर्ण देशात अराजकता पसरली आहे. कर्नाटक सरकारनं यासाठी आरसीबी व्यवस्थापन, कर्नाटक क्रिकेट असोसिएशन आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी डीएनएला जबाबदार धरलं आहे, त्यानंतर कब्बन पार्क पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे आणि 4 जणांना अटक केली आहे. पण या सगळ्यामध्ये आता एचएम वेंकटेश नावाच्या एका स्थानिक व्यक्तीनं संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीविरुद्धही एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे. या मागणीसह व्यंकटेश यांनी कब्बन पार्क स्टेशनवर तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सांगितलं की ते या तक्रारीचा विचार आधीच दाखल केलेल्या तक्रारीत करुन करतील. एकुणच विराट कोहलीविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर त्याला अटक होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दुसरीकडे, शुक्रवारीच पोलिसांनी आरसीबीचे मार्केटिंग आणि महसूल अधिकारी निखिल सोसाळे आणि त्याचा सहकारी सुमंत यांना अटक केली. त्याच्याशिवाय, पोलिसांनी डीएनए मॅनेजमेंट कंपनीचे मॅनेजर किरण आणि त्याचा सहकारी मॅथ्यू यांनाही अटक केली. शुक्रवारीच या चौघांना बेंगळुरु येथील 41 व्या एसीजेएमसमोर हजर करण्यात आले, जिथून त्यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं. या चौघांनाही प्रपन्ना अग्रहारा तुरुंगात ठेवण्यात आलं आहे.