अमरावती : शेतकऱ्यांची कर्जमाफी, पिकाला हमीभाव यांसह विविध मागण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन पुकारलं आहे. आज या आंदोलनाचा सहावा दिवस असून बच्चू कडू यांची तब्ब्येत ढासळली आहे. आज बच्चू कडू याना रक्ताच्या उलट्या झाल्या.. त्यामुळे त्यांचे समर्थक आणि बच्चू कडू यांच्यावर प्रेम करणारी जनता चिंतेत आहे. यापूर्वीही बच्चू कडू यांचा बीपी कमी झाला होता, परंतु त्यांनी उपचारास नकार दिला होता.
शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी, त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती, दिव्यांग, विधवा महिलांना 6 हजार रुपये मानधन, वंचित घटकांचे प्रश्न या मागण्यांसाठी बच्चू कडूंनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. बच्चू कडूंच्या या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. त्यांच्या आंदोलनाला आता राज्यातूनही अनेक नेते मंडळी आणि संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. सरकार दरबारी सुद्धा हे आंदोलन मागे घेण्यासंदर्भात चर्चेचा मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बच्चू कडू यांनी ८ जूनपासून मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी बेमुदत अन्नत्याग आंदोलन केलं आहे. या आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे. मात्र सरकारने अजूनही शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू यांनी केलेल्या मागण्यांना आणि बच्चू कडू यांच्या आंदोलनाला गंभीर्याने घेतलेले नाही. तर दुसरीकडे, माझी अंत्ययात्रा निघाली तरी चालेल पण माघार घेणार नाही अशी भूमिका बच्चूभाऊंनी घेतली आहे. त्यातच आज बच्चू कडू याना अचानक रक्ताच्या उलट्या झाल्याने त्यांच्यावर प्रेम करणारी जनता चिंतेत पडली आहे. या राज्यात सध्या रोज कित्तेक शेतकरी आत्महत्या करतायत. रोज या राज्यात शेतकऱ्याची अंत्ययात्रा निघतेय. सरकारला बच्चूभाऊंची अंत्ययात्राच पाहायची आहे काय? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
दरम्यान, आता प्रहार संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आम्ही ज्या मागण्या केल्या आहेत त्या सरकारने लवकरात लवकर पूर्ण कराव्या अन्यथा १५ जूनला संपूर्ण राज्यात चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा थेट इशारा सरकारला देण्यात आला आहे. .या चक्काजाम आंदोलनात कोणतीही गाडी रस्त्यावर फिरताना दिसणार नाही. महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांनी…. शेतकऱ्यांची काळजी असणाऱ्या विविध संघटनांनी आणि बच्चू कडू याना पाठिंबा देणाऱ्या पक्षांनी या आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन प्रहार कडून करण्यात आलं आहे.
प्रकृती चिंताजनक
बच्चू कडू यांची प्रकृती पूर्णपणे खालावली त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. पोटात अन्न नसल्याने बच्चू कडू यांच्या किडनी व शरीराच्या इतर भागावर परिणाम झाला आहे. वैद्यकीय पथकाकडून बच्चू कडू यांच्या शरीराची पूर्णपणे तपासणी करण्यात आली आहे. बच्चू कडू यांना डॉक्टरांकडून सलाईन घेण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र बच्चू कडू यांचा सलाईन घेण्यास नकार दिला. कार्यकर्ते व शेतकर्यांकडून बच्चू कडू यांना सलाईन घेण्याची विनंती करण्यात आली, मात्र मागण्या पूर्ण होईस्तर आपण औषधोपचार घेणार नाही, असा पवित्रा कडू यांनी घेतला आहे. मंत्री भरत गोगावले, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री जयकुमार गोरे या मंत्र्यांसोबत मागण्या संदर्भात बच्चू कडू यांची ऑनलाइन बैठक झाली. मात्र या ऑनलाईन बैठकीमध्ये ठोस आश्वासन न मिळाल्याने बच्चू कडू उपोषणावर ठाम आहेत.