अहमदाबाद : अहमदाबाद येथे नुकत्याच घडलेल्या भीषण विमान अपघातात शेकडो प्रवाशांचा आणि काही इंटर्न डॉक्टरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात विमानतळ परिसरातील अनेक प्राणी आणि पक्ष्यांचाही जीव गेला. अपघात इतका गंभीर होता की त्याने देशभरात चिंता निर्माण केली असून विमान वाहतूक सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर एअर इंडियाच्या बोईंग कंपनीच्या विमानावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अनेक दाखले देत ह्या विमानाच्या सुरक्षिततेवर आणि त्याच्या उड्डाणावर, तांत्रिक बाबींवर चर्चा होत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील अपघाताच्या घटनेवर शोक व्यक्त करताना काही संदर्भ देत बोईंग विमानाच्या तांत्रिक बाबी तपासण्यासंदर्भात आवाहन केलं होतं. तर, बोईंग कंपनीविरुद्ध गेल्या काही वर्षांत अनेक तक्रारी आल्या आहेत. डीजीसीएने (DGCA) एअर इंडियाला सुरक्षा उपाययोजनांबाबत अनेक पत्रे लिहिली होती. अमेरिकन सरकार आणि संसदेनेही या प्रकरणाची चौकशी केली आहे, अशी माहिती नागरी उड्डाण मंत्रालयाच्या माजी सहसचिव सनत कौल यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे, आता सरकारने बोईंग कंपनीच्या विमानासंदर्भाने मोठा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाकडून तपासणीसंदर्भातला रिपोर्ट डीजीसीएला सुपूर्द करावा लागणार आहे.
डीजीसीएने एअर इंडियाला लिहिलेल्या पत्रात एअर इंडियाच्या देखभाल आणि तपासणी प्रक्रियेबद्दलही प्रश्न उपस्थित झाले आहेत. अहमदाबाद विमान अपघाताच्या तपासात आता एटीएसचीही एंट्री झाली आहे. तर, बोईंग विमानाच्या संदर्भातने केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एअर इंडिया विमान दुर्घटनेनंतर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने म्हणजेच डीजीसीएने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, सरकारने बोईंग 787-8/9 विमानांच्या सुरक्षा तपासणीचे आदेश दिले आहेत. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून DGCA ने एअर इंडिया कंपनीच्या बोईंग 787-8/9 विमानांच्या ताफ्यावर अतिरिक्त देखभाल आणि तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा बोईंग कंपनीची ड्रीमलायनर मालिका वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या पार्श्वभूमीवर भारताच्या नागरी उड्डाण महासंचालनालयाने (DGCA) मोठा निर्णय घेत, ड्रीमलायनर विमानांच्या तातडीच्या आणि सखोल तपासणीचे आदेश दिले आहेत.
१५ जूनच्या मध्यरात्रीपासून सक्तीची तपासणी
DGCAने आदेश दिला आहे की, १५ जूनच्या मध्यरात्रीपासून भारतातून उड्डाण करणाऱ्या प्रत्येक ड्रीमलायनर विमानाची विशेष तांत्रिक तपासणी करणे बंधनकारक असेल. ही तपासणी पुढील आदेश येईपर्यंत नियमितपणे करण्यात येईल.
तांत्रिक तपासण्यांचे तपशील
उड्डाणापूर्वी खालील महत्त्वाच्या यंत्रणांची सखोल तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे:
डीजीसीएचे महत्त्वाचे निर्देश:
1. 15 जून 2025 पासून भारतातून उड्डाण करण्यापूर्वी प्रत्येक विमानाची तपासणी बंधनकारक:
2. इंधन पॅरामीटर मॉनिटरिंग आणि संबंधित प्रणालींची तपासणी
3. केबिन एअर कंप्रेसर आणि संबंधित यंत्रणांची तपासणी
4. इलेक्ट्रॉनिक इंजिन कंट्रोल सिस्टिम चाचणी
5. इंधन चालित अॅक्युएटर व फ्युएल सिस्टिम तपासणी
6. हायड्रॉलिक प्रणालीची सेवा स्थिती तपासणी
7. टेकऑफ पॅरामीटर्सचा आढावा
8. ‘फ्लाइट कंट्रोल इन्स्पेक्शन’ ही प्रणाली तात्पुरत्या कालावधीत दरम्यानच्या तपासणीत समाविष्ट केली जाणार आहे.
9. पॉवर अॅश्युरन्स चेक पुढील दोन आठवड्यांत पूर्ण करणे आवश्यक.
10. मागील 15 दिवसांत झालेल्या तांत्रिक बिघाडांच्या पुनरावलोकनानंतरच देखभाल प्रक्रिया पूर्ण समजली जाईल.
या तपासण्यांव्यतिरिक्त टेकऑफपूर्वी सर्व संबंधित पॅरामीटर्सचे बारकाईने निरीक्षण करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
पॉवर अॅश्युरन्स तपासणी आणि बिघाडांचा आढावा
पुढील दोन आठवड्यांच्या आत प्रत्येक ड्रीमलायनर विमानासाठी पॉवर अॅश्युरन्स तपासणी करणे देखील सक्तीचे करण्यात आले आहे. त्याचबरोबर गेल्या १५ दिवसांत या प्रकारच्या विमानांमध्ये आलेल्या तांत्रिक बिघाडांचा सविस्तर आढावा घेण्याचे आणि ते तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत.
२०१३मधील जपान अपघाताची आठवण
याआधी २०१३ मध्ये जपानमध्ये ड्रीमलायनर विमानाचा अपघात झाल्यानंतरही DGCAने तीन महिने या विमानांचे उड्डाण थांबविले होते. त्यानंतर तब्बल १२ वर्षांनी पुन्हा एकदा हे विमान सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून केंद्रस्थानी आले आहे. हा निर्णय प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून, भविष्यातील संभाव्य अपघात टाळण्यासाठी DGCAने उचललेले हे पाऊल निर्णायक ठरेल, अशी अपेक्षा आहे.