अहमदाबाद : अहमदाबाद मधील एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेने संपूर्ण भारतासह जगाला हादरवलं आहे. 242 प्रवाशांसह लंडनला जाणारं विमान काल दुपारी (12 जून) टेकऑफ नंतर अवघ्या काही क्षणात खाली कोसळलं आणि मेघानी येथील नागरी वस्तीत कोसळलं. यामध्ये 250 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये विमान प्रवाशांसह, विमान ज्या मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहाला धडकलं तेथील काही विद्यार्थ्यांचाही मृतांमध्ये समावेश आहे. टेकऑफनंतर विमान काही क्षणात खाली कोसळलं आणि आगीचे मोठे लोळ उठले, त्यामुळे अनेक प्रवासी होरपळले, गंभीर जखमी झाले. विमानातील प्रवाशांमध्ये भारतीय नागरिकांसह, ब्रिटनचे तसेच पोर्तुगीज आणि कॅनडाच्या नागरिकांचाही समावेश होता.
विमान दुर्घटनेतील मृतदेह नातेवाईकांना देण्यापूर्वी त्यातील प्रत्येक भागाची डिएनए चाचणी करून सारे अवशेष एकाच मृतदेहाचे आहेत, याची खात्री करून घेण्याची मागणी आता नातेवाईंकडून केली जात आहे. एअर इंडिया विमान दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना आता कुटुंबियांचं पार्थिव अंत्यस्कारासाठी देण्यास सुरूवात होईल. अहमदाबादच्या सिव्हिल रूग्णालयात मृतांच्या नातेवाईकांकरिता एक स्वतंत्र डिएनए चाचणी कक्ष तयार करण्यात आला आहे. तिथं येणा-यांचे डिएनए नमुने घेत ते मृतदेहाच्या नमुन्यांशी जुळवून मृतदेहाची ओळख पटवली जात आहे.
अहमदाबादमध्ये गुरुवारी (12 जून) एअर इंडियाचं विमान कोसळलं. या विमानात 242 लोक होते, त्यापैकी फक्त एकच व्यक्ती जिवंत राहिला. याशिवाय या अपघातात इतर सर्व लोकांचा मृत्यू झाला. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील होते, त्यांचाही मृत्यू झाला. हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते, अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमानाला अचानक अपघात झाला. आता या अपघातामागील कारण तपासलं जात आहे. दरम्यान, या विमान दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना त्यांच्या कुटुंबीयांचं पार्थिव अंत्यसंस्कारासाठी देण्यास सुरुवात होईल. मात्र, ही विमान दुर्घटना इतकी भयानक स्वरूपाची होती की, प्रवाशांच्या मृतदेहात फार काही शिल्लकच नाही, अशी परिस्थिती आहे. अनेकांच्या शरीराचे अवयव शिल्लक नाहीत. अनेकांच्या शरीराचे अवशेष अक्षरश: गोळा करून जोडण्यात आले आहेत. मात्र, तरीही प्रशासनाच्या वतीनं सर्वाच्या धार्मिक आणि सामाजिक भावना जपण्याचा पूर्ण प्रयत्न केला जात आहे.
अहमदाबाच्या सिव्हील रुग्णालयात मृतांच्या नातेवाईकांकरिता एक स्वतंत्र डीएनए चाचणी कक्ष तयार करण्यात आला आहे. तिथं येणाऱ्यांचे डीएनए नमुने घेत ते मृतदेहाच्या नमुन्यांशी जुळवून मृतदेहाची ओळख पटवली जात आहे. ओळख पटल्यानंतर 72 तासांनी मृतदेह ताब्यात देण्याची प्रक्रिया पार पडेल, असं रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
हिंदू धर्मासह अन्य सर्व धर्मात अंत्यसंस्कार हा फार महत्त्वाचा धार्मिक विधी आहे. त्यामुळं प्रशासनानं प्रत्येकाच्या भावनेचा आदर करायला हवा. या दुर्घटनेत अनेकांनी नातेवाईकांच्या रूपानं आपलं सर्वस्व गमावलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील मृत व्यक्तींचे अवशेष परत घेताना ते आपल्याच व्यक्तीचे आहेत ना? अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होणं स्वाभाविकच आहे. अंत्यसंस्कार ही मोक्षप्राप्तीकरिता मानवी शरीरावर करण्यात येणारी सर्वात शेवटची क्रिया असते. ती पुन्हा कधीही न होणारी असते, त्यामुळे ती विधिवतच व्हायला हवी, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होणं स्वाभाविकच आहे. आणि त्यामुळेच ही मागणी महादेव पवार आणि आशा पवार या मृत पावलेल्या दांपत्याचे पुतणे महेश पवार यांनी केली आहे
या अत्यंत भावनिक मुद्द्यावर सिव्हील रुग्णालय प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. मात्र ही शंका उपस्थित केल्यानंतर संबंधित सरकारी अधिकाऱ्यांनी दिले जाणारे मृतदेहाचे अवशेष हे तुमच्याच नातेवाईकाचे आहेत, याची खात्री बाळगा, असा सांत्वनात्मक दिलासा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून कुटुंबीयांना देण्यात आलेला आहे.
दरम्यान, अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलच्या कसोटी भवन येथे आज(14 जून) पुन्हा सकाळपासून डीएनए टेस्ट प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंत आतापर्यंत 240 डीएनए टेस्ट करण्यात आले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत 227 प्रवाशांच्या नातेवाईकांच्या डीएनए टेस्ट करण्यात आले आहेत, तर इतर 13 मृतदेहांच्या नातेवाईकांच्या डीएनए टेस्ट करण्यात आले आहेत. डीएनए टेस्ट काम अजूनही कसोटी भवन येथे सुरू असून उर्वरित मृतांच्या नातेवाईकांना सुद्धा डीएनए टेस्टचा आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे. साधारणपणे 72 तासानंतर डीएनए टेस्ट मॅचचे रिपोर्ट समोर येतील. त्यामुळे नातेवाईकांना संयम ठेवण्याचं आवाहन सुद्धा करण्यात येत आहे.