अमरावती: शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या मानधनात वाढ या प्रमुख दोन मागण्या घेऊन गेल्या 5 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अखेर आपलं उपोषण आज मागे घेतलं.पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात आंदोलनकर्त्यांचे उग्र रुप दिसून आले. दरम्यान, मंत्री उदय सामंत यांच्याकडून पाणी पिऊन कडू यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे कर्जमाफीबद्दल कधीच बोलत नव्हते. पण, आपल्या आंदोलनाने, उपोषणाने त्यांना यावर बोलायला भाग पाडलं.
अजित पवार आज पुण्यातील कार्यक्रमात याबाबत बोलले, असे म्हणत बच्चू कडू यांनी सरकारने आपल्या मागण्या विचार घेतल्याचे सांगत अन्नत्याग आंदोलन मागे घेतलं आहे. आपलं अन्नत्याग आंदोलन आपण मागे घेत नसून पुढे ढकलत असल्याचे कडू यांनी म्हटले. दरम्यान, जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर उदय सामंतजी तुमच्या घराबाहेर आम्ही आंदोलन करू, असा इशारा बच्चू कडूंनी दिला. त्यानंतर, मंत्री उदय सामंत यांच्याकडून पाणी पिऊन कडू यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं.
राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. सामंत यांनी १५ दिवसांच्या आत उच्चस्तरीय समिती नेमण्याची घोषणा केली आहे. यासोबतच, दिव्यांगांच्या मानधन वाढीच्या मागणीसाठी ३० जून रोजी विशेष बैठक घेण्याचे आणि यासंदर्भात अधिकृत पत्र देण्याचे आश्वासन दिले आहे. कडू यांच्या नेतृत्वाखालीली अन्नत्याग आंदोनाने सरकारला झुकवले असून ५१ उपोषमकर्त्यांपैकी एकाची तब्येत बिघडल्याने आंदोलन मागे घेण्याच विनंती राज्य सरकारने केली. सामंत यांनी पत्रातील सर्व मागण्या लवकर पूर्ण करण्याची ग्वाही दिली आहे.
सरकारला २ ऑक्टोबरपर्यंत मुदत
सरकारच्यावतीने मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी बच्चू कडू यांनी भेटली होती. या भेटीत सरकारने त्यांच्या मागण्यांची गंभीरतेनं दखल घेतली असून मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय पटलावर येईल, असे म्हटले होते. त्यानंतर, आज मंत्री उदय सामंत यांनी लेखी पत्र दिल्यानंतर बच्चू कडूंनी आपलं उपोषण सोडलं आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल आश्वासन दिलं, तेच पत्र उदय सामंत यांनी बच्चू कडूंना दिले आहे. प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांचे गेल्या सहा दिवसापासून अमरावतीत अन्नत्याग आंदोलन सुरु होते. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी हे अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.
अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी बच्चू कडूंची भेट घेत अन्नत्याग आंदोलन मागे घ्यावं, अशी विनंती केली होती. मात्र बच्चू कडू आपल्या मागण्यांवर आणि उपोषणावर ठाम आहेत. बावनकुळेंनी कडूंची मुख्यमंत्र्यांशीही चर्चा घडवून आणली. यावेळी कडूंच्या पत्नी नयना कडू भावनिक झाल्याचं पहायला मिळालं. त्यानंतर, आज मंत्री उदय सामंत यांच्या भेटीनंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं असून बच्चू कडू यांच्याकडून सरकारला 2 ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. सरकारने मागण्या मान्य न केल्यास 2 ऑक्टोबरनंतर पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, बच्चू कडू यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी उद्या 15 जून रोजी राज्यभरात करण्यात येणारे रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. त्यामुळे, उद्या कुणीही रास्ता रोको आंदोलन करू नये, असे आवाहनही यावेली बच्चू कडू यांनी केली.