मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना टोलमाफी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने 18 जून ते 10 जुलै दरम्यान ही टोलमाफी असणार आहे. पंढरपूरला जाणाऱ्या 10 मानाच्या पालखी मार्गावर ही टोलमाफी असणार आहे. याचा लाभ वारकरी, मानाच्या पालख्या आणि भाविकांना मिळणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने या संबंधित एक परिपत्रक जारी केलं आहे. त्यामध्ये पंढरपूरला जाणाऱ्या जड आणि हलक्या वाहनांना टोलमाफीचा फायदा मिळणार आहे. त्यासाठी गाडी क्रमांक, चालकाचे नाव नोंद करून त्याचे स्टिकर्स परिवहन विभाग, पोलिस किंवा आरटीओ यांच्याकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
काय आहे सरकारचा जीआर
आगामी सन २०२५ च्या आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या तसेच भाविकांच्या व वारकऱ्यांसाठीच्या सोयी-सुविधा, त्यांचे वाहनांना पथकरातून सूट देणे, तसेच वारी मार्गावरील रस्ते दुरुस्ती या विषयाच्या अनुषंगाने मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांचे अध्यक्षतेखाली दि. २८ मे, २०२५ रोजी बैठक संपन्न झाली.
सदर बैठकीमध्ये खालीलप्रमाणे चर्चा होऊन मा. मुख्यमंत्री महोदयांनी विविध विभागांना त्या अनुषंगाने सुचना व निर्देश दिले आहेत, त्यास अनुसरुन सर्व संबंधितांना या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे पुढीलप्रमाणे सूचित करण्यात येत आहे:-
१) पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या, भाविक व वारकऱ्यांना “आषाढी एकादशी २०२५”, गाडी क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर नमूद करुन आवश्यक त्या संख्येनुसार स्टीकर्स परिवहन विभाग, वाहतूक पोलीस / पोलीस, संबंधीत आर.टी.ओ. यांचेशी समन्वय साधून पोलीस स्टेशन्स, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. ऑफीसेस मध्ये उपलब्ध करुन द्यावेत. पंढरपूरला जातेवेळी व परत पंढरपूरहुन येतेवेळी दिनांक १८.०६.२०२५ ते १०.०७.२०२५ या कालावधीत ही सवलत पालख्या, भाविक व वारकऱ्यांच्या हलक्या व जड वाहनांसाठीच असेल, अशा सूचना दिल्या आहेत. तसे स्टीकर्स / पास वर नमूद करण्यात यावे. सदरचे पास परतीच्या प्रवासाकरिता ग्राह्य धरण्यात येतील याप्रमाणे स्टीकर्स तयार करण्यात यावेत. (नमूना सोबत जोडला आहे.) मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांनी याबाबत सर्व पोलीस अधिकाऱ्यांना गृह विभागामार्फत अवगत करण्याबाबत सुचना दिल्या आहेत.
२) सर्व पथकर नाक्यांवर स्वतंत्र पोलीस यंत्रणा ठेवावी. तसेच परिवहन विभागास देखील जादा बसेस गाड्या सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाहतूक सुरळीत राहण्याच्या दृष्टीकोनातून HSP (Highway Security Patrolling) मार्फत पथकर नाक्यांजवळ पोलींसाची व्यवस्था करावी. सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (MSRDC), डेल्टा / MSSC (Maharashtra State Security Council) फोर्स जास्त संख्येने तैनात करण्याचेही निर्देश दिले आहेत.
३) आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तसेच राज्यातील इतर सर्व संबंधित रस्ते / महामार्गावर रुग्णवाहीका व क्रेनची व्यवस्था करण्यात यावी. मुंबई-कोल्हापूर-बंगलोर, पुणे-सोलापूर, इ. राष्ट्रीय मार्गावर सुद्धा क्रेनची व्यवस्था करण्याचे निर्देश MSRDC, NHAI, PWD च्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना त्वरीत कळविण्याचे आदेश दिले आहेत.
४) तसेच गरज पडल्यास सूरक्षित व सुरळीत वाहतुकीसाठी जड वाहनास आवश्यक असल्यास बंदी घालण्याबाबत परिवहन विभागाने योग्य ती कार्यवाही करावी.
५) महाराष्ट्र राज्यभरातून पंढरपूरला जाणारे रस्ते (उदा. मुंबई मधील सायन ते पनवेल महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग, पुणे-सोलापूर, पुणे-सातारा-कोल्हापूर ते राज्य सिमेपर्यंतचा महामार्ग, इ. महामार्ग तसेच मुंबई-पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग व मुंबई-पुणे-सोलापूर राष्ट्रीय मार्गाला जोडणारे नवीन राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग, ग्रामिण रस्ते, इ.) या सर्वांचे खड्डे भरणे, दुरुस्ती कामे, सुचना फलके लावणे इत्यादी कार्यवाही त्या त्या कार्यान्वयीन यंत्रणांनी (सा.बां. विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग, NHAI, इ.) करावीत.
६. सदर कालावधीत रस्ता सुस्थितीत आणण्याची कामे राष्ट्रीय महामार्ग विभाग व NHAI ने तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश मा. मुख्यमंत्री महोदयांनी दिले आहेत.
७. दर २०-२५ कि.मी. अंतरावर पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, इ. यंत्रणांनी संयुक्तिक रुग्णवाहीका, रस्ते खड्डे भरण्यासंबंधी मटेरीअल, क्रेन, इ. व्यवस्था ठेवावी. तसेच बऱ्याच महामार्गावर रस्ते सुधारण्याचे काम प्रगती पथावर आहेत, अशा कामांवर वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सर्व संबंधित महामार्ग प्राधिकाऱ्यांनी आवश्यक ती उपाययोजना करावी.
८. महाराष्ट्र राज्यातून पंढरपूरकडे येणारे सर्व पथकर नाक्यांवर उपरोक्त कालावधीत पथकर माफी नसलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना पथकरातून सुट द्यावी, असे ठरले व राज्य परिवहन (S.T.) विभागाच्या अधिकाऱ्यांनी गरजेप्रमाणे संबंधीत पोलीस ठाणे, इ. कडे या अनुषंगाने कुपन / पास प्राप्त करुन घ्यावेत. महाराष्ट्र राज्यभरातून पंढरपूरला जाणारे भाविक, वारकरी तसेच पालख्यांच्या वाहनाना संबंधित जिल्ह्यातील व शहरातील सर्व पोलीस ठाणे व वाहतुक विभाग/ शाखा/ चौकी येथून भाविकांचे मागणीप्रमाणे पथकर माफ (टोल फ्री) पासचे वाटप करण्यात यावे.
९. ग्रामीण पोलीस / आर.टी.ओ. यांचेमार्फत दिले जाणारे कुपन्स / पावती यांची संख्या बाबतीत एकत्रित माहिती संबंधित महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास / सा.बां. विभागास / NHAI कार्यालये यांना माहितीकरीता सादर करावी. जेणेकरुन भाविक व वारकरी वाहनांना पथकरातून सवलत दिल्यानंतर संबंधित उद्योजकांना State Budget मधून नुकसान भरपाई देणेत येईल.
१०. नाक्यांवर वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी जास्तीत जास्त मनुष्यबळ, ट्रॅफीक वार्डन व हँड होल्डींग मशीन ठेवण्यात यावेत, ज्यामुळे या कालावधीत पथकर नाक्यांवर वाहतुक कोंडी होणार नाही. याबाबत सर्व संबंधित महामार्ग प्राधिकारी, पथकर कंत्राटदार यांनी कार्यवाही करावी.
११. पथकर कंत्राटदारांनी संबंधीत रस्त्याच्या क्षेत्रात / परिसरात वाहतुक पोलीसांसाठी आषाढी एकादशीच्या काळात जादाचे ट्रॅफीक वॉर्डन डेल्टा किंवा एम.एस.एस. फोर्स उपलब्ध करुन द्यावेत.
१२. पोलीस व परिवहन विभागाने आषाढी एकादशीच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती जनतेस होण्याकरिता आवश्यकतेप्रमाणे अधिसूचना/ जाहीर प्रसिध्दी करावी.
या सुचना सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणण्यात याव्यात. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२५०६१६१८३१२४५११८ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.